रांची – एकीकडे देशात रोनाने धुमाकूळ घातला आहे तर दुसरीकडे झारखंडमध्ये इथल्या नागरिकांना नव्या समस्येला सामोरे जावं लागत आहे. रांचीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरांनी धुमाकूळ घातला आहे. मागील १० दिवसात या परिसरात १२ पेक्षा अधिक चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे यावर इथल्या नागरिकांनीच तोडगा काढत दरवाजांवर काही पोस्टर्स लावले आहेत. तेच पोस्टर्स सध्या चर्चेचा विषय बनत आहेत.
चोरीमुळे लोकांच्या मनात एवढी भीती निर्माण झाली असून त्यांनी चक्क घराच्या बाहेर पोस्टर्स चिटकवले आहेत. ज्यात लिहिलंय की, “याठिकाणी आधीच चोरी झाली आहे. उगाच कष्ट करू नका” . चोरीच्या या घटनांमुळे घरमालकच नव्हे तर भाडेकरूही त्रस्त झालेत. लोक घराला कुलूप लावून बाहेर जाण्यासही घाबरत आहेत. रांचीच्या पुगदाग परिसरातील भगवती नगरमध्ये एकाच रात्री अनेक घरांमध्ये चोरीची घटना घडली. ज्यात लाखो रुपयांसह सोने, चांदी आणि रोकड लंपास करण्यात आली आहे.
पुनदागच्या परिसरात शनिवारी एकाच रात्री अनेक घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या. शिक्षण विभागात काम करणाऱ्या जितेंद्र सिंह यांच्या घरी चोरांनी कुलूप तोडून रोकड आणि ज्वेलरी चोरी झाली. त्यांच्याच घरात भाड्याने राहणाऱ्या मनोज अग्रवाल यांच्या घरातही चोरांनी हात साफ केला. त्याचसोबत शेजारील संजीव कुमार खन्ना यांच्या घरी रोकड, ज्वेलरी चोरण्यात आली. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. या परिसरात राहणाऱ्या राहुल यांनी सांगितले की, चोरीच्या घटना वाढत असताना पोलीस प्रशासन मात्र आरोपींना पकडण्यात अपयश आले आहे. त्यामुळे घराच्या सुरक्षेसाठी आता लोक चोरांना आवाहन करताना पोस्टर्स पाहायला मिळत आहे.