उदयनराजे यांचे गौरवोद्गार, छत्रपती शिवरायांना अपेक्षित राज्यकारभार मोदी यांनी केला
सातारा – राष्ट्रहिताचे निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवला. छत्रपती शिवरायांना अपेक्षित असणारा राज्यकारभार मोदी यांनी करत चिखलातून कमळ फुलवले, म्हणून त्यांचे नाव घेण्यास मला सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी आज पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
सैनिक स्कूलच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार सभा गुरूवारी सायंकाळी चार वाजता झाली. त्यावेळी ते बोलत होते. उदयनराजे म्हणाले, “गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार यांच्यामुळे सातारा जिल्हा व नरेंद्र मोदी यांचे भावनिक नाते आहे. स्वराज्य, पंचायत राज, सर्वधर्मसमभाव या विचारांवर आधारित मोदी यांचा राज्यकारभार सुरू आहे.’ पश्चिम महाराष्ट्र हा आघाडीचा बालेकिल्ला आहे, यामध्ये कोणी घुसू शकत नाही, असे दावे विरोधक करताना कलम 370 व महाराष्ट्राचा संबंध काय, असे सवाल करतात, विरोधकांनी देशाच्या अस्मितेचं भानं ठेवाव, असा टोला उदयनराजे यांनी लगावला. मराठयांच्या स्वयंघोषित नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या दृष्टीने कधीच प्रयत्न केले नाहीत, अशी टीका उदयनराजे यांनी शरद पवारांचे नाव न घेता केली.
नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला व विधेयकही अस्तित्वात आणले. त्यांनी विकासाचे राजकारण केले नाही, असे उदयनराजे यांनी सांगितले. तर आघाडी सरकारने केवळ पदे भोगून साताऱ्याचे आयआयटी, आयआयएम, मेडिकल कॉलेज, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र या योजना अडगळीत टाकल्या.
त्यामुळे प्रत्यक्ष विकास कामांची अंमलबजावणी करणाऱ्या नरेंद्र मोदींचे नाव घेताना मला अभिमान वाटतो, असे उदयनराजे म्हणाले. माझ्या आतील आवाजाने साताऱ्याच्या विकासासाठी भाजपबरोबर जायला हवे, असा कौल दिला म्हणून मी तीन महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला. असे मी केले नसते तर ज्या जनता जनार्दनाने माझ्यावर विश्वास टाकला ते मला सोडून गेले असते. पूर्ण भारत हा मोदीजींचा परिवार आह,े म्हणूनच मी त्यांच्याबरोबर असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.
भिडे गुरूजी आले आणि गेले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असताना व्हीआयपी कक्षातून “शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान’चे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी पुढे आले. तेव्हा त्यांच्यावर पटापट कॅमेरे रोखले गेले. भिडे गुरूजी यांना व्यासपीठावर बोलावले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या येण्याची कोणतीही सन्माननीय दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे भिडे गुरुजी आले तसे पाचच मिनिटांत लगोलग माघारी फिरले.
कासची फुले… अन् वजराईचा धबधबा
सातारकरांच्या काळजाला हात घालताना मोदी यांनी साताऱ्याचे अनेक संदर्भ वापरून सर्वांना संमोहित केले. आई तुळजाभवानी व छत्रपती शिवरायांना अभिवादन अशी भाषणाची सुरवात मोदी यांनी करताच सभामंडपात टाळ्यांचा एकच गजर झाला. गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार यांच्यामुळे सातारा ही गुरूभूमी असल्याचे मोदी यांनी नमूद केले. अपशिंगे गावातील घराघरांतील राष्ट्ररक्षक, याशिवाय कासची फुले व वजराईचा धबधबा याचा संदर्भ देऊन मोदींनी साताऱ्याच्या पर्यटनाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे आश्वासन दिले. स्थानिक मुद्यांना मोदींनी हात घातल्याने सातारकरांनीसुद्धा त्यांच्या भाषणाला भरभरून दाद दिली.
गर्दी आवरताना पोलीसांना नाकीनऊ
सभामंडपात जेवढी श्रोत्यांची गर्दी होती, त्याच्या दुप्पट गर्दी बाहेर रस्त्यावर मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी होती. नरेंद्र मोदी यांचे दुपारी चार वाजता लष्कराच्या हेलिकॉप्टरने सभास्थळी आगमन झाले तेव्हा सैनिक स्कूल प्रवेशद्वार ते जिल्हा परिषद मैदान परिसर हा रस्ता अक्षरशः गर्दीने ओसंडून वाहिला. काही लोकांनी मोठे वाहन रस्त्यावर लावले. त्याच्या टपावर चढून मोदींचे भाषण ऐकण्याची खटपट केली. ही गर्दी आवरताना पोलिसांची मात्र प्रचंड कसरत झाली. काही ठिकाणी पोलीस व नागरिक यांच्यात किरकोळ वादावादीचे प्रकार घडले.