पुणे – कॉंग्रेसमध्ये सर्व जाती, धर्म, भाषा, प्रांत सामावले असून दंगली घडविणाऱ्या भाजपच्या भूलथापांना बळी पडू नका. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांनाच बहुमताने विजयी करा, असे आवाहन तेलंगणाचे कॉंग्रेस खासदार रेवंथ रेड्डी यांनी येथे केले.
कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ घोरपडी गाव येथील आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते.
यावेळी कॉंग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सरचिटणीस किरण रेड्डी, नगरसेवक अविनाश बागवे, हर्षद बोराटे, संजय कवडे, चंद्रकांत कवडे, सुरेखा कवडे, चिन्नया, समीर हाके, बाळा शेट, श्रीनिवास, प्रदिप परदेशी, रामय्या, महाआघाडीचे कार्यकर्ते व तेलगू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रेड्डी म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत वेंकय्या नायडू यांनी येथील तेलगू बांधवांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र, भाजप आमदारांनी घोरपडी आणि एकूण कॅन्टोन्मेंटसाठी काहीही विकास काम केले नाही. आता मी खासदार रेवंथ रेड्डी छातीठोकपणे सांगतो की, कॅन्टोन्मेंटच्या सर्वांगीण विकासासाठी रमेश बागवे यांनाच मतदान करून विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित मतदारांना केले. त्यांनीही त्याला जोरदार प्रतिसाद दिला.
गेल्या 5 वर्षांत या भागातील घोरपडी रेल्वे गेट, ओव्हर ब्रीज, वाहतुकीचा प्रश्न कायम असून या भागातील समस्या सोडविण्यासाठी आपले प्राधान्य राहणार आहे. त्यामुळे विधानसभेसाठी आपल्याला बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन बागवे यांनी यावेळी मतदारांना केले.