सातारा : युवकांनी रोजगार शोधण्यापेक्षा रोजगार देणारे बनावे. यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र परिवारामार्फत यशोदा टेक्नीकल कॅम्पस, वाढे येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून उद्योगमंत्री सामंत बोलत होते.
सामान्य कुटुंबातील युवकांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगून उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, तरुणाईच्या हाताला रोजगार देणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्याचे उद्दीष्ट शासनाने ठेवले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम गावांगावांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. गेल्या १० महिन्यात उद्योग विभागाने या योजनेच्या माध्यमातून १३ हजार उद्योजक उभे केले आहे. तसेच उद्योगांसाठी या काळात ५५० कोटींचे अनुदान दिले आहे. यावर्षी किमान २५ हजार उद्योजक उभे करण्याचे उद्दीष्ट आहे.
सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणार
सातारा जिल्ह्यातील उद्योगांच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून उद्योगमंत्री सामंत पुढे म्हणाले की, जिल्ह्यात आयटी पार्क उभारण्यात येईल. कामगारांसाठी रुग्णालय उभारु, त्यासाठी लागणारी जागा उद्योग विभागाकडून देण्यात येईल. सातारा एमआयडीसीसाठी पंधरा दिवसात प्रादेशिक अधिकारी देण्यात येईल, तसेच विद्यार्थ्यांना चांगले कौशल्य आत्मसात करता यावे, यासाठी स्कील सेंटरही उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.