पुणे – राज्यात सन 2011 च्या जनगणनेनुसार 1 कोटी 63 लाख निरक्षर आहेत. यात सर्वाधिक 10 लाख 67 हजार 823 एवढे निरक्षर हे “विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातच असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलेली आहे. टप्प्याटप्प्याने या निरक्षरांना साक्षर करण्यासाठी नव भारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
राज्याच्या योजना शिक्षण संचालनालयाने निरक्षरांची जिल्हानिहाय यादी जाहीर केलेली आहे. वय वर्षे 15 व त्यापुढील व्यक्तींचा या निरक्षरांमध्ये समावेश आहे. दर दहा वर्षांनी जनगणना होणे आवश्यक असते. मात्र सन 2011 च्या नंतर जनगणनाच झालेली नाही. सन 2021 मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे या कालावधीत जनगणनाच झालेली नाही.त्यामुळे आता या निरक्षरांच्या संख्येत आणखी वाढ झाल्याचीच शक्यता नाकारता येत नाही.
सन 2027 पर्यंत निरक्षरांना साक्षर करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्याची अंमलजबावणी सक्षमपणे करण्याची गरज आहे. नवतंत्रज्ञानाच्या आधुनिक काळात अद्यापही निरक्षरांची अधिक संख्या आढळून येत आहे. हे आश्चर्यकारकच म्हणावे लागणार आहे.
जिल्हानिहाय निरक्षरांची संख्या
अहमदनगर-7,84,324, अकोला- 1,76,760, अमरावती- 3,06,800, औरंगाबाद- 6,22,115, भंडारा- 1,65,629, बीड- 4,90,362, बुलढाणा- 3,50,350, चंद्रपूर- 3,77,177, धुळे- 435,006, गडचिरोली- 2,32,121, गोंदिया- 1,68,878, हिंगोली- 2,08,339, जळगाव- 7,34,335, जालना- 4,45,985, कोल्हापूर- 6,08,097, लातूर- 4,52,549, मुंबई शहर- 2,79,095, मुंबई उपनगर- 7,81,919, नागपूर- 4,50,489, नांदेड-6,66,075, नंदूरबार- 4,51,336, नाशिक- 8,60,258, उस्मानाबाद- 2,97,456, पालघर- 6,81,573, परभणी- 3,95,277, पुणे- 10,67,823, रायगड- 3,66,247, रत्नागिरी- 2,50,406, सांगली- 4,42,807, सातारा- 4,34,099, सिंधुदुर्ग- 1,06,395, सोलापूर- 8,24,484, ठाणे- 6,81,574, वर्धा- 1,46,281, वाशिम- 1,65,537, यवतमाळ- 3,95,814.