नवी दिल्ली – नॅशनल मोनेटाइझेशन पाइपलाइन (एनएमपी), या केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेला कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन तीव्र शब्दात विरोध केला. तसेच युवा पिढीला रोजगाराच्या संधीपासून भविष्यात मुकावे लागेल.
शिवाय यामुळे देशाचे भविष्य धोक्यात येणार असल्याचे स्पष्ट मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले. निवडक उदयोगपतींसाठी पंतप्रधान देशाचे आर्थिक स्वातंत्र्य धोक्यात आणत आहे, असा आरोप करायलाही ते विसरले नाही.
“एनएमपी’च्या पहिल्या 3 क्षेत्रांमध्ये रस्ते, रेल्वे आणि वीज क्षेत्र यांचा समावेश असेल. त्याचा उद्देश सार्वजनिक मालमत्तेतील सरकारी गुंतवणुकीचा संपूर्ण खर्च वसूल करणे आहे. ते म्हणाले की, पुढील चार वर्षांत, 15 रेल्वे स्टेडियम, 25 विमानतळ आणि केंद्र सरकारचा विद्यमान विमानतळ आणि 160 कोळसा खाणींवर कमाई केली जाईल असे केंद्र सरकार सांगत असले तरी फक्त देशातील चार ते पाच उदयोगपतींना श्रीमंत करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
खासगीकरणाला कॉंग्रेसचा विरोध नाही आहे, पण ते करताना देशाचे नुकसान होऊ नये हे कॉंग्रेस पक्षाचे धोरण आहे. मात्र केंद्र सरकार रेल्वे सारख्या जनोपयोगी गोष्टीचे खासगीकरण करत असेल तर भविष्यात देशातील युवा पिढीला रोजगार मिळणे कठीण होऊन बसेल.
केंद्र सरकार पुढील चार वर्षांत आपली मालमत्ता वापरण्याचा अधिकार विकून आणि इनविट सारख्या गुंतवणुकीच्या इतर मार्गांद्वारे 6 लाख कोटी रुपये ( 81 अब्ज) उभारण्याची योजना आखत आहे. यामुळे सरकारला तिजोरी भरण्यास आणि वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल, तसेच दीर्घकाळ पायाभूत क्षेत्राला आधार मिळणार असल्ययाचे केंद्र सरकारने म्हटले होते.