पिंपरी – गेल्या तीन आर्थिक तिमाहींपासून आयटी कंपन्या गळतीने त्रस्त आहेत. ज्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळविणे तरुणांचे स्वप्न असते त्या कंपन्या देखील आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यापासून रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. बड्या आयटी, आयटीइएस, बीपीओ, केपीओ कंपन्यांमध्ये नोकरी सोडण्याचे सरासरी प्रमाण दहा टक्क्यांचे पुढे गेले असल्याचे गेल्या तीन आर्थिक तिमाहीत दिसून आले आहे.
केपीओ आणि बीपीओ सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये नोकरी सोडणाऱ्यांचे प्रमाण खूपच अधिक आहे. जास्त पगार आणि उच्च पद यासाठी कर्मचारी नोकऱ्या बदलत आहेत. याचा थेट परिणाम कंपन्यांच्या कामांवर पडत आहे. यापूर्वी देखील कंपन्यांनी नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जाचक अटी लादल्या होत्या. आता काही बड्या कंपन्यांनी या अटी अधिकच जाचक केल्याचे दिसून येत आहे.
प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये नोकरी करता येणार नाही
एका बड्या आयटी कंपनीने थेट ऑफर/जॉइनिंग लेटरमध्ये म्हटले आहे की, नोकरीवरुन काढल्यास प्रतिस्पर्धी कंपनीमध्ये लगेच नोकरी जॉइन करता येणार नाही. तसेच कंपनीच्या ग्राहकाकडे देखील नोकरी करता येणार नाही. याचाच अर्थ की नोकरीवरुन काढले जाणाऱ्या कर्मचाऱ्यास सुमारे एक वर्ष बेरोजगार राहावे लागेल. कंपनीने तर आपल्या ऑफर/जॉइनिंग लेटरमध्ये प्रतिस्पर्धी कंपनींची नावे देखील लिहिली आहेत.
का सोडतात नोकरी?
बीपीओ कंपन्यांकडे मुख्यतः विदेशातील कंपन्यांची अकाउंट्सची कामे खूप असतात. यात प्रामुख्याने एपी (अकांउंट्स पेएबल), एआर (अकांउंट्स रिसिव्हेबल) आणि जीएल (जनरल लेजर) हे तीन भाग असतात. एपीमध्ये काम करणाऱ्यांकडे काम खूप अधिक असते आणि पगार कमी. एआरमध्ये काम करणाऱ्यांना महिन्यातील काही दिवस खूप काम असते आणि एपीच्या तुलनेत पगार अधिक असतो. तर जेएलमध्ये पूर्ण अकांउंटिंगचे काम असल्याने पगारही खूप अधिक असतो. तसेच करियरमध्ये ग्रोथही अधिक असल्याचे मानले जाते. त्यामुळे पगारवाढ आणि वरील पदावर काम करण्यासाठी नोकरी बदलली जाते.
हातात नोकरी नसतानाही राजीनामा
कंपन्यांनी दोन ते तीन महिन्यांचा नोटीस पिरीयड ठरविला आहे. दुसरीकडे नोकरी शोधून सध्या कार्यरत असलेल्या नोकरीतून राजीनामा देणे या परिस्थितीत अवघड आहे. कारण बहुतेक कंपन्या इंटरव्यू पास झाल्यानंतर जॉइनिंगसाठी दोन ते तीन महिने वाट पाहण्यास तयार नसतात. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्याला सध्या काम करत असलेल्या कंपनीला नोटीस पिरीयड इतका बेसिक पगार कंपनीला द्यावा लागतो. यामुळे अनेकांनी हातात दुसरी नोकरी नसतानाही राजीनामे दिले आहेत. या काळात आयटीयन्स नवीन पद किंवा ज्या सेक्टरमध्ये काम करायचे आहे त्याची तयारी करतात आणि नंतर इंटरव्यूला जातात.