इस्लामपूर (प्रतिनिधी) : पावसाळ्या पूर्वी शहरातील धोकादायक इमारतीच्या मालकांना व अस्वच्छ रिकाम्या प्लॉट धारकांना नोटीस देणे, शहरातील गटार प्रवाहित करण्यासह शहरात नियमित औषधे फवारणीचा निर्णय नगरपालिकेच्या सभेत घेण्यात आला. दहा जूनपर्यंत पावसाळ्या पूर्वीची कामे व्हायला हवीत अशी मागणी नगरसेवकांनी केली.
पावसाळ्या पूर्वीच्या कामांसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राजारामबापू पाटील नाट्यगृहात नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारीची नियोजन बैठक झाली. उपनगराध्यक्ष दादासो पाटील व मुख्याधिकारी प्रज्ञा पवार उपस्थित होत्या.
इस्लामपूर शहरामध्ये रस्त्याकडेला वाढलेली झाडे तोडण्यात येत आहेत. विजेच्या तारांना झाडे अडथळा ठरत असल्याचा आरोप नगरसेवक विक्रम पाटील यांनी केला. वठेलेली झाडे तोडावीत अशी मागणी करण्यात आली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागांमध्ये असणाऱ्या रिकाम्या प्लॉटवर अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. हे रिकामे प्लॉट स्वच्छ करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्याची माहिती यावेळी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. शहरातील सर्व गटारांची स्वच्छता केली जावी. गटारातील घाण काढताना पूर्ण गाळ निघाला गेला पाहिजे याची दक्षता घ्यायला हवी. तो सध्या काढला जात नसल्याचा आरोप नगरसेवक प्रदीप पवार यांनी केला. शहरातील अनेक मुकादमांचे स्वच्छतेसाठी लक्ष नाही. ते नेमके कुठे असतात ? काय करतात ? हे माहीत नसते यामुळे अडचणी येतात अशी तक्रार नगरसेवकांनी केली.
येणाऱ्या पावसाळ्यात डेंगूच्या साथीचा प्रसार रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील यावर चर्चा झाली. शहरातील रिकामे प्लॉट, पंचर काढण्याचे दुकाने, भंगार दुकाने, पाणी साठणारे तळ मजले अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती वाढत आहे. अशी ठिकाणे निश्चित करून डास मुक्त करण्यासाठी सूचना करण्यात आल्या. येथे वेळवर औषधे फवारणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
शहरातील भुयारी गटारांच्या अपुऱ्या कामांबाबत सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. भुयारी गटारी काम सुरू करण्यापूर्वी एसटीपी प्लॅन जागा निश्चित करायला हव्या होत्या. त्या निश्चित करण्याची प्रकिया शासन स्तरावर प्रलंबित असल्याची माहिती नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सभागृहाला दिली.
भुयारी गटारीची कामे अर्धवट आहेत.रस्ता करता येत नाही.पोट चेंबर करता येत नाहीत अशी तक्रार नगरसेवक संग्राम पाटील यांनी केली. अनेक विकास कामाच्या अनुदानाचे पैसे परत गेले आहेत. काही कामांना स्थगिती असल्याचे नगराध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
काही भागात पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याचे नगरसेवक संजय कोरे यांनी केली. काही उपनगरात नैसर्गिक उंचीवर घरे असल्याने तिथे पाणी येत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. सर्व प्रभागात स्वछता, औषध फवारणी नियमितपणे करावी अशी मागणी करण्यात आली. नगरसेवक आनंदराव पवार, सीमा पवार , शकील सय्यद, विश्वास डांगे,शहाजी पाटील, सुनीता संपकाळ यांनी चर्चत भाग घेतला.