नवी दिल्ली – राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “एनआयए’ने आज महाराष्ट्रातील 5 ठिकाणी छापे घातले. यामध्ये मुंबई आणि पुण्यातील काही ठिकाणांचाही समावेश आहे. हे छापे इस्लामिक स्टेटशी संबंधित प्रकरणी घालण्यात आले आहेत. मुंबईतील 4 आणि पुण्यातील एका ठिकाणी घातलेल्या याछाप्यांची कारवाई संध्याकाळी उशीरापर्यंत सुरू होती, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
“एनआयए’ने इसिसशी संबंधित एक प्रकरण या वर्षाच्या सुरुवातीला दाखल केले होते. या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून काही ठिकाणी दहशतवादी कारवाया करण्याच्या कटाचा तपास “एनआयए’कडून केला जातो आहे. “एनआयए’चा तपास सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतर या कटाबाबतचा पूर्ण तपसील उघड होऊ सकणार आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे.
दोनच दिवसांपूर्वी “एनआयए’ने कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील इसिसच्या कटाशी संबंधित 9 जणांच्याविरोधात पहिले पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात, आरोपींनी शिवमोग्गा येथे आयईडी स्फोटाची चाचणी केली होती, तसेच इस्लामिक स्टेटच्या कटाचा एक भाग म्हणून, लोकांमध्ये दहशत आणि भीती पसरवण्यासाठी अनेक ठिकाणी जाळपोळ करून मालमत्ता आणि वाहनांची जाळपोळीसारख्या दहशतवादी आणि हिंसाचाराच्या घटनांचा कट देखील केला होता.
मार्च महिन्यात “एनआयए’ने “इस्लामिक स्टेट-खोरसान स्टेट’शी संबंधित प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून मध्यप्रदेशातील सेओनी आणि पुण्यातील चार ठिकाणांची तपासणीही केली होती. जहानझैब सामी वानी आणि त्याची पत्नी हीना बेग या काश्मिरी दाम्पत्याला दिल्लीतील जामिया भागातून अटक केल्यानंतर हे प्रकरण सर्वप्रथम दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाकडे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास “एनआयए’ने करण्यास सुरुवात केली.