मुंबई – कालच हिवाळी अधिवेशन चांगलंच वादळी ठरलं असून, विरोधक आणि सत्ताधारी पक्षांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न दोन दिवसांपूर्वी करण्यात आला होता. त्यानंतर काल म्हणजेच, चौथ्या दिवशी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची देखील कोंडी करण्यात आली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं आहे. दरम्यान, फडणवीसांनी एसआयटीची घोषणा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
विशेष म्हणजे दिशा सालियनचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचं सीबीआयने म्हटलं होतं. त्यानंतरही फडणवीस यांनी हे प्रकरण एसआयटीकडे सोपवलं आहे. मात्र, आता फडणवीस यांच्या या घोषणेमुळे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची कोंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयानंतर स्वतः आदित्य ठाकरे आपली प्रतिक्रिया दिली. “32 वर्षाच्या तरुणाला खोके सरकार घाबरले’ असल्याचा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला. घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून बदनामी करण्याचे आणि लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ठाकरे यांनी म्हटले होते.
मात्र, आता याच मुद्द्यावरून भाजपाचे नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. यावेळी ते पत्रकारांशी सवांद साधत होते. नारायण राणे म्हणाले, “आदित्य ठाकरे जे सांगत आहेत, की माझा काही संबध नाही. 32 वर्षांच्या तरुण सगळ्यांना पुरून उरला. अरे, सत्तेचा दुरुपयोग करून एका मुलीवर अत्याचार करून, तिची हत्या करणे हा पुरुषार्थ आहे का? चौकशी होऊ द्या मग त्यांना समजेल.” असं राणे म्हणाले आहेत.