पुणे : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची पुन्हा विभागात वर्णी लावल्याने नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता या चर्चाना खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्णविराम लावला असल्याचे दिसत आहे.
उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील करोना परिस्थितीची आढावा बैठक पार पडली. बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांना जयंत पाटील यांच्या प्रकाणावर भाष्य केले.
अजित पवार म्हणाले, “एक मिनिटं… हे माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भात असेल, तर त्याचं उत्तर जयंत पाटीलच देतील. जयंत पाटील खूप वरिष्ठ नेते आहेत. अनेक वर्ष त्यांनी राज्याचं अर्थ मंत्रालय सांभाळलं. गृह मंत्रालय सांभाळलं. ग्रामविकास मंत्रालय सांभाळलं.
आता ते जलसंपदा मंत्रालय सांभाळतात. त्यांच्या कामाची पद्धत बघितली, तर ते अतिशय शांत स्वभावाचे आणि अधिकाऱ्यांकडून काम करून घेणारे आहेत. उलट जरा तापट स्वभावाचा कडक बोलणार मीच आहे. ते तर एकदम माझ्याविरुद्ध आहेत. या बातम्या कशा आल्या, कधी आल्या माहिती नाही. ज्याला महत्त्व द्यायला नको, त्यालाच आपण महत्त्व देतोय. त्यामुळे लोकांच लक्ष तिकडे जातं.
माझी सगळ्या माध्यमांना विनंती आहे की, यामध्ये काही तथ्य नाही. हा प्रशासनाचा भाग असतो. प्रशासनातील मुख्यमंत्री आणि मंत्री तसेच मुख्य सचिव आणि अधिकारी. आम्ही काही पहिल्यांदाच मंत्री झालेलो नाही, अनेक वर्ष आम्ही प्रशासन चालवलं आहे,” असे म्हणत अजित पवार यांनी या मुद्द्यावर भाष्य केले .