फुरसुंगी – पुणे-पंढरपूर या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गास राष्ट्रीय महामार्ग क्र.965 म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्यानंतरही या मार्गाची दुरुस्ती, रुंदीकरण, चौपदरीकरण होण्याऐवजी कमालीची दुरवस्था झाली आहे. सर्वत्र खड्डे, चढ-उतार, पाण्याची डबकी, चिखल अशी अवस्था असल्याने यालाच राष्ट्रीय महामार्ग म्हणतात का? असा सवाल स्थानिक नागरिकांसह वारकरी सांप्रदाय तसेच वाहनचालकांकडून सातत्याने केला जात आहे.
याबाबत या मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र, निवेदन अगदी ट्विटरवर देखील या पालखी मार्गाच्या दुरूस्तीबाबत सातत्याने मागणी केली आहे. परंतु, त्यानंतरही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या पालखी मार्गावर हडपसर ते सासवड दरम्यान मोठी दुरवस्था झाली आहे. पालखी सोहळ्यापूर्वी काही ठिकाणी डागडुजीचे काम करण्यात आले होते. परंतु, ते काम खूपच दर्जाहीन असल्याने पावसामुळे खडी, डांबर उखडल्याचे निदर्शनास आले आहे. या मार्गावर पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे.
अशास्रीय पद्धतीने साइडपट्ट्या खोदून खड्डे केल्याने वाहतूक सुरळीत होण्याऐवजी चिखल, राडारोडा पसरून मोठमोठे खड्डे तयार होऊन त्यातून डबकी तयार झाली असून रस्ता खड्ड्यात गेला आहे. सध्या, संततधार पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देवून या रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी, मागणी शादाब मुलाणी व सोमनाथ यादव यांनी केली आहे.