मुळा विभागाची साडे अठरा कोटी थकबाकी : शेतकऱ्यांकडे साडेसात तर औद्योगिक वसाहतीकडे 6 कोटी 70 लाख थकले
नगर – सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून देण्यात येणाऱ्या पाण्याच्या पाणीपट्टीची थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकरी, स्थानिक स्वराज्य संस्थांसह साखर कारखाने व पाणीपुरवठा योजनांच्या पाणीपट्टीची तब्बल 18 कोटी 55 लाख 87 हजार 803 रुपये थकबाकी एकट्या मुळा पाटबंधारे विभागाची आहे.
पाणी हे जीवन असल्याने केवळ प्रबोधन, विनवण्याशिवाय या विभागाला कोणतीही कारवाई करता येत नसल्याने थकबाकीदारांचे फावले आहे. त्यामुळे या विभागाची आर्थिक कोंडी झाली आहे.
नगर दक्षिण जिल्ह्यातील नगर शहरासह पाच तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या मुळा धरणातून सिंचन व पाण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. 26 टीएमसी जलसाठा असलेले मुळा धरण हे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. सिंचनासाठी शेतकऱ्यांना रब्बी, खरीप व उन्हाळी असे आवर्तन सोडण्यात येते. पण आज या शेतकऱ्यांकडेच तब्बल 7 कोटी 58 लाख 11 हजार 803 रुपये पाणीपट्टीची थकबाकी आहे. मुळा पाटबंधारे विभागात पाच उपविभाग आहेत.
उपविभागनिहाय थकबाकदार शेतकरी व थकबाकी पुढीलप्रमाणे आहे. राहुरी- 7 हजार 741 शेतकऱ्यांकडे 2 कोटी 36 लाख 15 हजार 915, घोडेगाव- 9 हजार 671 शेतकरी 69 लाख 51 हजार 888. नेवासे- 14 हजार 674 शेतकऱ्यांकडे 2 कोटी 46 हजार 73 हजार 959. चिलेखनवाडी- 14 हजार 436 शेतकरी 1 कोटी 46 लाख 23 हजार 986. अमरापुर- 10 हजार 184 शेतकऱ्यांकडे 59 लाख 46 हजार 55 रुपये थकबाकी आहे.
शेतकऱ्यांना घनमापन पद्धतीने पाणीपट्टीची आकारणी केली जाते. पण तीही ते भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. बिगर सिंचन संस्थांकडे तब्बल 10 कोटी 97 लाख 76 हजार थकबाकी आहे. त्यात औद्योगिक वसाहतीकडे सर्वाधिक 6 कोटी 70 लाख रुपये थकबाकी आहे. थकबाकीदार संस्था पुढीलप्रमाणे आहे. नगर महापालिका- 2 कोटी 38 लाख 18 हजार, राहुरी नगरपालिका- 20 लाख 80 हजार, देवळाली प्रवरा नगरपालिका- 14 लाख 4 हजार, महात्मा फुले कृषि विद्यापीठ- 2 लाख 90 हजार, मुळा सहकारी साखर कारखाना- 38 लाख 78 हजार, ज्ञानेश्वर साखर कारखाना- 39 लाख 31 हजार, वृद्धेश्वर साखर कारखाना- 10 लाख 36 हजार, वांबोरी ग्रामपंचायत- 1 लाख 61 हजार, सोनई ग्रामपंचायत- 2 लाख 72 हजार, शनि शिंगणापूर ग्रामपंचात- 38 हजार.
बारागाव नांदूर पाणीपुरवठा योजना- 14 लाख 90 हजार, मिरी व 22 गावे पाणीपुरवठा योजना- 6 लाख 74 हजार, भेंडा कुकाणा पाणीपुरवठा योजना- 8 लाख 37 हजार, कुरणवाडी चिंचाळे पाणीपुरवठा योजना- 19 लाख 2 हजार, बुऱ्हाणनगर 48 गावे पाणीयोजना- 4 लाख 85 हजार, चांदा व इतर 5 गावे पाणीपुरवठा योजना- 1 लाख 60 हजार, तर सोनई करजगाव पाणीपुरवठा योजना- 12 लाख 67 हजार. थकबाकी वसुलीसाठी पाटबंधारे विभागाकडून केवळ नोटिसा पाठविण्यात येत आहे. पण या नोटिसांना कोणीच जुमानत नाही. त्यामुळे या विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत. याकडे लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. केवळ पाण्याची मागणी केली जाते. पण पाणीपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
पाणी वापर संस्था नावालाच
2005 पूर्वी व्यक्तिगत शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून सिंचनाला पाणी देण्यात येत होते. पण सिंचन व्यवस्थापन कायदा झाल्यानंतर पाणीवापर संस्थांच्या मार्फत शेतकऱ्यांना पाणी देण्यात येत आहे. पण या संस्था नावालाच आहे. शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसुली करण्यात येते. पण ती पुढे पाटबंधारे विभागाला भरण्यात येत नाही. तसेच या संस्थांना देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे. पण तेही या संस्था करीत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या दुरुस्तींचा खर्च पाटबंधारे विभागाला करावा लागत आहे.