राहाता, (प्रतिनिधी)- पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. वाढत्या चोऱ्या, अवैध धंदे, वाळू तस्करी, मोबाईल चोऱ्या, दादागिरीमुळे खाकीतील दादांचा धाक आणि दरारा नसल्यामुळे पोलिसांची कामगिरी सध्या नामधारी बनल्याचे दिसून येत आहे. तर गुन्हेगारांची दहशत वाढत चाललेली आहे
राहाता पोलीस ठाण्याचा कारभार नवीन पोलीस अधिकाऱ्यांनी घेतल्यापासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे विद्युत पंप केबल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता या नवीन कारभाऱ्यांच्या कर्तबगारीमुळे मोठी हताश दिसून येत आहे.
अवैध धंदे विशेषत: मटका अड्डे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे यातून दररोज अनेक जण बरबाद होत आहेत. पोलिसांच्या आशीर्वादामुळे यामध्ये वाढ झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांचा खाकीवर असलेला विश्वास लोप पावत आहे. राहाता पोलीस स्टेशनला आलेल्या नवीन अधिकाऱ्यांनी हे मटका धंदे मोडीत काढून सर्वसामान्य जनतेचा व नागरिकांचा विश्वास संपादन करणे गरजेचे झाले आहे.