नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमासाठी केवळ सहाच केंद्रे निश्चित केल्यामुळे राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज या संघांनी बीसीसीआयवर टीका केली आहे.
यंदा ही स्पर्धा दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता आणि अहमदाबाद या सहा केंद्रांवरच खेळवण्यात येणार असल्याचे जाहीर झाल्यावर राजस्थान, सनरायजर्स आणि पंजाब या संघांनी नाराजी व्यक्त केली आहे. राजस्थान, हैदराबाद आणि पंजाब या तिन्ही संघांच्या मालकांनी याबाबत बीसीसीआयकडे लेखी तक्रार केली असून त्यांच्या निर्णयाचा निषेधही केला आहे.
साखळी सामने विनाप्रेक्षक खेळवा – वाडिया
आयपीएलच्या साखळी फेरीतील सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी दिली जाऊ नये. देशातील करोनाची परिस्थिती पाहून त्यावर निर्णय घेता येईल. देशात करोनाचा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत असून त्यामुळे निदान स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना तरी प्रेक्षकांना प्रवेश नाकारणेच योग्य ठरेल, असे मत पंजाब किंग्ज संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी व्यक्त केले.
आता, या संघांनी सादर केलेल्या तक्रारीवर बीसीसीआय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. गेल्या वर्षी करोनाच्या धोक्यामुळे स्पर्धा अमिरातीत घेतली होती. यंदा कमीत कमी केंद्रे ठेवूनच ही स्पर्धा घ्यावी लागणार ही भूमिका बीसीसीआय बदलणार का असा प्रश्न आहे.
अमरिंदरसिंग यांचे आवाहन
आयपीएल स्पर्धेतील एकही सामना मोहालीच्या मैदानावर होणार नसल्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सामन्यांच्या आयोजनासाठी निवडलेल्या केंद्रांतून मोहालीला वगळण्यात आल्यामुळे त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. बीसीसीआय व आयपीएल समितीने या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.