औरंगाबाद – करोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. राज्यातील नवीन करोनाबाधितांमध्ये मोठी वाढ होत आहे. काल राज्यात 24 तासात 9855 नवीन करोना रूग्णांची भर पडली आहे. अमरावती, हिंगोली जिल्हा प्रशासनाने शहरात कडक लाॅकडाऊन लागू केला आहे. अशातच करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन औरंगाबाद प्रशासनानेही महत्वाचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबादमधील गर्दीच्या भागांमध्ये पुन्हा लाॅकडाऊन लागू करण्यात येणार आहे. पैठण गेट, गुलमंडी, कॅनाॅट प्लेस, जाधवमंडी या गर्दीच्या भागांमध्ये स्थानिक प्रशासनाने लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शहरातील इतरही परिसरांत कडक निर्बंध लागू असणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
24 तासात 371 नवीन करोना रूग्णांची नोंद
औरंगाबाद शहरात करोना रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. बुधवारी दिवसभरात 371 नवीन करोना रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे येथील एकूण रूग्णांची संख्या 51,287 झाली आहे. यापैकी 47564 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला आहे. तर आतापर्यंत 1278 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2445 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, राज्यात करोनाचे रूग्ण वाढतच आहेत. अमरावती महापालिकेतील 80 कर्मचारी, अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाली, यापैकी पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली आहे. पुण्यातही गेल्या काही दिवसांपासून करोना रूग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली असून शहरातील 10 क्षत्रिय कार्यालयांच्या विभागात 42 कंटेन्मेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत.