मुंबई – करोनामुळे केवळ क्रीडा संघटनांचेच नाही तर प्रायोजकांचेही हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे येत्या काळात देशातील बाजारपेठ सावरली तरच यंदाची आयपीएल स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते, अन्यथा या स्पर्धेला रद्दच करावे लागणार आहे, असे संकेत मिळत आहेत.
मार्चपासून ही स्पर्धा मूळ वेळापत्रकानुसार सुरू होणार होती. मात्र, त्याचवेळी करोनाचा धोका सुरू झाला आणि क्रिकेटसह सर्वच जागतिक व देशांतर्गत क्रीडा स्पर्धांवर संकट आले. बीसीसीआयलादेखील आयपीएल लांबणीवर टाकावी लागली. आता ही स्पर्धा भारतात होणार की परदेशात याबाबत सध्या विविध चर्चा समोर येत आहेत. मात्र, आता प्रायोजकांनीही पाठ फिरविण्याचे संकेत दिल्यानंतर या स्पर्धेवरचे मळभ आणखी दाट झाले आहे.
ही स्पर्धा जर रद्द झाली तर बीसीसीआयला जवळपास 5 हजार कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. त्यामुळेच श्रीलंका, दक्षिण आफ्रिका व अमिराती या देशांनी आयपीएल आपल्या देशात आयोजित करण्याचे प्रस्ताव दिले होते. त्यावर बीसीसीआयने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला नसला तरीही येत्या काही दिवसांत जर प्रायोजकांनी पाठिंबा कायम ठेवला तरच ही स्पर्धा होईल अन्यथा यंदाची स्पर्धा अन्य देशात होऊ शकेल का याचा आढावा घ्यावा लागेल.
ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने ही स्पर्धा आयोजित करण्यास असमर्थता व्यक्त केली होती त्यामुळे याबाबत आयसीसी या आठवड्यात निर्णय घेणार आहे. जर ही स्पर्धा रद्द झाली तरच आयपीएलची शक्यता वाढणार आहे.
अर्थात, त्यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने पाकिस्तान सुपर लीग लांबणीवर टाकून आशिया करंडक जर त्या विंडोमध्ये खेळवला तरच ऑक्टोबरची विंडो बीसीसीआयला मिळेल व त्या काळात आयपीएल स्पर्धा आयोजित करणे शक्य होणार आहे. मात्र, त्यापूर्वी बीसीसीआयला या स्पर्धेच्या सर्व प्रायोजकांकडून करार कायम ठेवलेची हमी घ्यावी लागेल व त्यासाठी करोनामुळे अवकळा आलेली बाजारपेठ सावरली गेली पाहिजे.
… नुकसान होण्याची शक्यता जास्त
बीसीसीआयचा स्टारशी जवळपास 17 हजार कोटी रुपयांचा करार आहे. पाच वर्षांच्या या करारातील जवळपास 2 हजार कोटी बीसीसीआयला मिळाले आहेत. जर बाजारपेठ सावरली गेली नाही तर तोटा निश्चित असल्याने प्रायोजकांच्याच मनात स्पर्धेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आयपीएलचे भवितव्य आयसीसी पेक्षा प्रायोजकांवरच जास्त अवलंबून आहे.