विकासदर वाढविण्यावर भर द्यावा : एन के सिंह
नवी दिल्ली – केंद्र आणि राज्य सरकारांची एकत्रित तूट राष्ट्रीय उत्पन्नाच्या 12 टक्क्यांपर्यंत जाणार आहे. सरकारचे कर्ज राष्ट्रीय उत्पन्नाच्या 84 टक्क्यांवर गेले आहे. मात्र तरीही तूट आणि कर्जाची चिंता न करता सरकारने खर्च वाढवून अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्याला प्राधान्य द्यावे, असे वित्त आयोगाने म्हटले आहे.
10 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंह म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व क्षेत्राची उत्पादकता शक्य तितक्या लवकर पूर्वपदावर येण्याची गरज आहे. यासाठी सरकारने स्वतः खर्च वाढवून, खाजगी क्षेत्राला खर्च वाढविण्यास चालना देण्याची गरज आहे.
सरकारने हा एक कलमी कार्यक्रम राबवावा. दरम्यानच्या काळामध्ये तूट वाढली किंवा कर्ज वाढले तरी त्याबाबत नंतर नियोजन करण्यावर विचार करावा. अमेरिका आणि युरोपातील विकसित देशासह सर्वच देशात सध्या अशाच प्रकारचा विचार केला जात आहे. त्यामुळे तुलनात्मक दृष्टया भारत त्या देशाबरोबरच राहणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.
सर्व देशांची तूट वाढणार
केवळ भारताची तूट आणि कर्ज वाढणार नाही. तर इतर देशांची तूट व कर्ज वाढणार आहे. त्यामुळे धोरणात्मक दृष्टया भारत मागे पडणार नाही. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांना काम मिळण्याची गरज आहे. त्याचबरोबर सरकारला करोना व्हायरसशी लढा द्यायचा आहे. त्यामुळे परंपरागत चौकटीबाहेर जाऊन काम करावे लागणार आहे, असे सिंह यानी सांगितले.