मुंबई – आयपीएल स्पर्धेत कित्येक खेळाडूंना करोडो रुपयांचे करार मिळतात. मात्र, हे करार फसवे असून यातून विविध प्रकारचे कर वजा करून खेळाडूंना प्रत्यक्षात खूपच कमी रक्कम मिळते.
खेळाडूंवर करोडो रुपयांची बोली लावली जाते व त्यांना 10 ते 20 कोटी रुपयांचेही करार मिळतात. मात्र, प्रत्यक्षात खेळाडूंची इनहॅण्ड कमाई पाहिली तर यात प्रचंड रकमेची कपातही होताना दिसते. खेळाडूंना अन्य नागरिकांप्रमाणेच कर भरावा लागतो. तसेच बोलीमधून मिळणाऱ्या रक्कमेतून टीडीएसही कापला जातो.
भारतीय खेळाडूंना लिलावातून मिळणाऱ्या रकमेतून टीडीएसची कपात केली जाते. एकूण रकमेच्या दहा टक्के टीडीएसच्या नावे वजा केले जातात. यानंतर खेळाडूंना आयटीआर दाखल करावा लागतो. यामध्ये खेळाडूंचे इतर उत्पन्न आणि खर्चाचा हिशोब असतो. त्यामुळे खेळाडूंना निव्वळ उत्पन्नाच्या आधारावर कर द्यावा लागतो. टीडीएसची गणना केवळ बोली रकमेच्या आधारावरच केली जाते.
भारताबाहेरील खेळाडूंना भारतात मिळणाऱ्या उत्पन्नावर 20 टक्के टीडीएस द्यावा लागतो. मात्र, परदेशी खेळाडूंना भारतीय खेळाडूप्रमाणे टीडीएसव्यतिरिक्त अन्य कोणताही कर अदा करावा लागत नाही. परदेशी खेळाडूंना केवळ भारतातील उत्पन्नावरच कर द्यावा लागतो. त्यांना आयटीआर दाखल करण्याचीही आवश्यकता नसते.
कर कपातीनंतर नेमका किती पैसा मिळतो याचा प्रत्यक्ष अंदाज लावणे कठीण आहे. बोली रक्कम बेस प्राइस स्वरूपात असते. खेळाडूंचे कंपनीसोबत विविध प्रकारचे करार असतात. खेळाडूंसोबत केलेल्या करारानुसार त्यांना पैसे मिळतात. कोणत्याही खेळाडूचा अंतिम 11 खेळाडूंच्या संघात स्थान मिळाले नाही, तर त्याला कमी पैसे दिले जातात.