कोलकाता – वेस्ट इंडीजला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत व्हाइटवॉश दिल्यावर भारतीय संघाचे मनोबल चांगलेच उंचावले आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्माने येथे होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतही वेस्ट इंडीजवर निर्विवाद वर्चस्व राखू, असा विश्वास व्यक्त केला आहे.
एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत संघातील प्रत्येकाने आपला वाटा उचलला होता व त्यामुळेच हा मालिका विजय साकार झाला. आता अशीच कामगिरी टी-20 सामन्यांच्या मालिकेतही करण्यासाठी संघ सज्ज बनला आहे.
संघातील मधल्या फळीतील फलंदाजांनी आपल्यावरील जबाबदारी समर्थपणे पार पाडली. आता या मालिकेत जर सलामी चांगली मिळाली, तर पाहुण्या संघावर दडपण राखणे सोपे ठरेल, असेही रोहित म्हणाला.