माध्यम सम्राट कॅरी पॅकर यांनी सुरू केलेल्या वर्ल्ड क्रिकेट मालिकेला पॅकर सर्कस म्हणून हिणवले गेले. प्रक्षेपणाचा अडथळा आणला गेला नसता तर त्याचवेळी पॅकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या श्रीमुखात भडकावली असती, पण तसे झाले नाही व पॅकर यांना हे दुकान बंद करावे लागले, पण त्यांचीच संकल्पना चोरून परिषदेने एकदिवसीय सामने जन्माला घातले व आज हेच सामने पॅकर यांच्या कल्पनेप्रमाणे रंगीत कपडे, पांढरा चेंडूसह प्रकाशझोतात खेळविले जातात. काळाच्या पुढे जाणारा हा माणूस व त्याची दूरदृष्टी याचे आकलन वेळीच झाले असते तर आज चित्र वेगळे दिसले असते.
जागतिक क्रिकेटमधील बलाढ्य संघांतील प्रमुख खेळाडूंना पैशांचे आमिष दाखवून पॅकर हे जागतिक क्रिकेट अपंग करत आहेत, अशी बोंब मारणारे आज इंडियन प्रीमिअर लीगच्या माध्यमातून मिळत असलेल्या पैशांसाठी लाचार बनले आहेत. ठरावीक कालावधीनंतर या स्पर्धेत खेळाडूंचा लिलाव आयोजित केला जातो व त्याचवेळी निष्ठा आणि श्रद्धेचा बाजार भरतो. एखादा संघ पुढील मोसमासाठी काही खेळाडूंना लिलावासाठी रिलीज करतो तर दुसरा संघ अशा खेळाडूंवर बोली लावून त्याला आपल्या संघात विकत घेतो. खेळाडू देखील दरवर्षी आपली श्रद्धा अन्य कोणाच्या पायावर वाहतात. करोडो रुपयांचा हा खेळ असल्याने सुनील गावसकरांसारखे कसोटीचे बाळकडू घेतलेले खेळाडू देखील क्रिकेटच्या या सर्कसचे हतबल प्रेक्षक बनून राहतात. चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू यांचे नाते पूर्वीपासूनच सर्वश्रुत आहे, फक्त दरवर्षी त्यात नवीन नावे जोडली जातात. पैसा, पत, प्रतिष्ठा, मान-सन्मान हे सगळे मिळत असल्याने संघ मालकांचीच नव्हे तर खेळाडूंचीही कोणतीच तक्रार नसते.
एकदा रमाकांत आचरेकर सरांनी एक किस्सा सांगितला होता, एक महिला तिच्या आठ वर्षांच्या मुलाला घेऊन सरांकडे आली व म्हणाली माझ्या मुलाला पण सचिन तेंडुलकरसारखे लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनवा. सचिन आठ वर्षांचा असताना तुमच्याकडे आला आणि पंधराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनला. सर म्हणाले, अहो इतके सोपे गणित नसते क्रिकेटमध्ये. त्यासाठी माझ्या मार्गदर्शनाइतकीच त्या खेळाडूकडे गुणवत्ता आसावी लागते. काळ किती झपाट्याने बदलला बघा. काही वर्षांपूर्वी असेच एक पालक पुण्यातील प्रसिद्ध प्रशिक्षकाला म्हणाले, सर माझ्या मुलाला शिकवा. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट नाही खेळला तरी चालेल, पण तो आयपीएल मात्र खेळलाच पाहिजे.
आज टी-20 क्रिकेटने मूळ क्रिकेटचा पायाच डळमळीत केला आहे. कसोटी क्रिकेट ऑक्सिजनवर आहे. रटाळ सामने पाहायला कोणालाच वेळ नाही. एकदिवसीय सामने देखील आता कंटाळवाणे वाटू लागले आहेत. त्यामुळेच की काय टी-20 पाठोपाठ टी-10 क्रिकेटचा उदय झाला आहे. इंग्लंडमध्ये तर शंभर चेंडूंचेही क्रिकेट सुरू झाले आहे. 3 ते 4 तासांत संपणारे सामने आज फास्टफूडसारखे लोकप्रिय होत आहेत. आज कोणाकडे रस्त्यावरील ट्रॅफीक सिग्नलला 30 सेकंद थांबायलाही वेळ नसतो, तसे 6-7 तास चालणारे सामने देखील नकोसे झाले आहेत. सगळे कसे वेगवान पाहिजे. जंकफूडसारखे क्रिकेट देखील फास्ट ग्रोइंग झाले आहे. लाखो-करोडो रुपयांचा फायदा, निकाल काहीही लागला तरी वैयक्तिक नुकसान काही नाही, कामगिरी होणे महत्त्वाचे आहे, कशा पद्धतीने होते त्याला महत्त्व नाही. “तरिका सही हो ना हो नतिजा सही होना चाहीये’ म्हणतात तेच खरे.
2007 साली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने लावलेले आयपीएलचे रोपटे आज पूर्ण वाढ झालेले वडाचे झाड झाले असून त्याची पाळेमुळे सर्वदूर पसरत आहेत. त्याचमुळे आज क्रिकेटच्या शिबिरात तंत्रशुद्ध फलंदाजीचे धडे शिकवत नाहीत, तर क्रिकेटच्या मूळ नियमालाच वेशीला टांगले जाते. क्रिकेटचे कॉपीबुक सांगते की सामना सुरू झाल्यावर पहिला अर्धा तास गोलंदाजांना द्यायचा असतो, त्यांचे चेंडू जपून खेळायचे असतात व एकदा का खेळपट्टीचा अंदाज आला व चेंडू व्यवस्थित दिसू लागला की मग नंतरचे साडेसहा तास आपलेच राज्य असते.
आज इतका वेळ कोणाकडे आहे. त्यामुळे एकदिवसीय तसेच टी-20 क्रिकेटमध्ये धावा होणे महत्त्वाचे आहे त्या कशा होतात याला महत्त्व नाही, म्हणूनच आता कोणत्याही संघाकडे कसोटी क्रिकेटसाठी त्याच दर्जाचे फलंदाज नाहीत. एशेस वगळता एकाही कसोटी मालिकेला आता प्रेक्षक मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. गुलाबी चेंडूवर खेळले जाणारे दिवसरात्र कसोटी सामने लोकप्रिय होत आहेत, पण कसोटी क्रिकेटचे गतवैभव पुन्हा येणार नाही हे देखील सत्य आहे. अर्थात हे मी परदेशी संघांबाबत बोलत आहे, भारतात काय हो कोणत्याही गोष्टीसाठी लोक गर्दी करतात, पण ही केवळ गर्दी असते दर्दी नव्हे.
लिव्हींग स्टाइलसाठी काहीही
एखादा खेळाडू जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनतो त्यानंतर त्याच्या स्टाइल ऑफ लिव्हींगमध्ये प्रचंड कायापालट होतो. जोपर्यंत तो खेळत असतो तोपर्यंत त्याला फाइव्हस्टार राहणीमानाची सवय लागते, पण निवृत्तीनंतर त्याला या गोष्टीतील बदल मानवत नाही. मॅच फिक्सिंग घडले ते याचमुळे. लहान वयातील खेळाडू आधी स्थानिक क्रिकेट खेळत असतात पण त्यांना आयपीएलच्या माध्यमातून लहान वयात प्रचंड पैसा हाती आला की त्यांचे पाय जमिनीवर राहात नाहीत. मग इतक्या अफाट पैशांचे करायचे काय हा प्रश्न निर्माण होतो. मग या ग्लॅमरमुळे त्यांना चांगल्या चांगल्या सवयी लागतात व आयपीएलच्या संघाच्या मालकांसाठी जसे लिलावात गुलाम झालेले असतात तसेच पुढे जाऊन ते उच्च राहणीमानाच्या सवयीचे गुलाम होतात.
संघनिहाय निष्ठाही बदलते
आयपीएल जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासूनच अनेक दिग्गज खेळाडूंनी त्यावर सातत्याने टीका केली आहे, आजही टीका होत असते, पण अखेर निष्ठा व श्रद्धा आणि पैसा यात पैसाच जिंकतो. एक संपूर्ण वर्ष देशाकडून क्रिकेट खेळण्यापेक्षा केवळ 2 महिने आयपीएल खेळली तरी पुढील दोन वर्षांची बेगमी होते तिथे स्वत:ची विक्री होते याचे काहीच वैगुण्य वाटत नाही.
देशापेक्षा आयपीएलला प्राधान्य
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया वगळता क्रिकेट खेळणारे अन्य देश आता आयपीएलचे वेळापत्रक पाहून आपल्या मालिका आयोजित करतात. बाकी सगळ्या देशांच्या खेळाडूंना आयपीएल ही देशापेक्षाही जास्त महत्त्वाची वाटते, पण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंनी देशाच्या संघाकडून खेळण्याला प्राधान्य दिले असून यंदा देखील ज्यो रुट, इयान मॉर्गन, मिशेल स्ट्रार्क यांसारख्या खेळाडूंनी आयपीएलमधून गेल्या काही वर्षांत सातत्याने अंग काढून घेतले आहे.
पूर्वी महान खेळाडू म्हणायचे, श्रद्धा महत्त्वाची आहे. सध्याचे खेळाडू म्हणतात, श्रद्धा महत्त्वाची असते हे मान्य पण श्रद्धेने पोट नाही भरत. येत्या काळात जर मूळ क्रिकेट जिवंत ठेवायचे असेल तर या पैशांच्या मोहजालातून निदान युवा खेळाडूंना तरी दूर ठेवावे. अन्यथा भविष्यात रोहित शर्मा, शिखर धवन मिळतील पण सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मणसारखे महान कसोटीपटू मिळणार नाहीत. केवळ भारतीयच नव्हे तर जागितक क्रिकेटच्या सर्वच देशांच्या क्रिकेट मंडळांनी युवा खेळाडूंना निदान या फास्टफूड क्रिकेटपासून दूर ठेवावे, तरच कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट जिवंत राहील, अन्यथा वेगवान क्रिकेटपायी मूळ क्रिकेट नामशेष होईल. निष्ठा व श्रद्धेचा हा सुरू असलेला बाजार बंद व्हावा. जागतिक स्तरावर मूळ क्रिकेटचा गाभा कायम ठेवायचा असेल तर या क्षणिक फायद्याकडे दुर्लक्ष करून आणि फिक्सिंगची वाळवी झटकून पुन्हा एकदा दुर्जनांच्या हातातून या खेळाची सुटका करावी व पुन्हा एकदा हा खेळ सज्जनांचा म्हणून कीर्ती मिळवेल यासाठी प्रयत्न करावेत.
म्हणूनच फिक्सिंग होते
कमी वेळात व कमी श्रमात प्रचंड पैसा मिळतो. पैसा आणि लोकप्रियतेच्या आकर्षणापायी भुलून नवोदित खेळाडू चुका करून बसतात. काही खेळाडूंना माहीत असते की त्यांची कारकीर्द फार लांबणार नाही, तेव्हा ते प्रसंगी बुकींकडून किंवा सट्टेबाजांकडून मोठी रक्कम घेऊन फिस्किंगच्या दुष्टचक्रात आडकतात. एस. श्रीशांतचे तेच झाले. कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये देखील हेच घडले. एकेकाळी सज्जनांचा खेळ अशी प्रतिमा असलेला हा खेळ आता दलालांच्या हाती गेला आहे.
अमित डोंगरे