मुंबई -आयपीएलमध्ये खेळत असलेल्या सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशात येताना आपल्या स्वत:च्या जबाबदारीवर यावे आणि परतीची व्यवस्था ही त्यांची त्यांनीच करावी, असे वक्तव्य ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ते खेळाडू तिथे खासगी दौऱ्यावर गेले आहेत. आयपीएल हा काही ऑस्ट्रेलियन संघाच्या दौऱ्याचा भाग नाहीय. ते तिथे स्वत:च्या इच्छेने आणि स्वत:चा निर्णय घेऊन गेलेत. तिथे त्यांना अनेक सुविधा पुरवल्या जात आहेत. मला अपेक्षा आहे की ते त्यांच्या पद्धतीने ऑस्ट्रेलियात परत येण्याची सोय करतील, असे मॉरिसन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलियासह सर्वच परदेशी खेळाडूंना सुखरूप मायदेशी पोहोचवण्याची हमी दिली असली, तरी जर ऑस्ट्रेलियाप्रमाणे अन्य देशांनीही भारतीय विमानांना लॅंडिंगची परवानगी नाकारली, तर करायचे काय, हा प्रश्न अंधातरीच आहे. त्यामुळे आयपीएलच्या यापुढील सामन्यांवर टांगती तलवार दिसून येत आहे.
अशातच राजस्थान रॉयल्सच्या संघातले चार खेळाडू मायदेशी परतत असल्याने त्यांना “कुणी खेळाडू देते का,’ अशी वेळ आताच आली आहे.कोविड-19 चा प्रादुर्भाव भारतात वाढत असल्याने भारतातून येणाऱ्या विमानांना 15 मेपर्यंत ऑस्ट्रेलियात बंदी घालण्यात आल्याने आता मोठी समस्या निर्माण झाली आहे.
डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथसह आयपीएलमध्ये उपस्थित असणारे प्रशिक्षक, कॉमेंटेटर तसेच जवळपास 30 ऑस्ट्रेलियन दिग्गज मायदेशी परतण्यास उत्सुक आहेत. मुंबई इंडियन्सचा खेळाडू ख्रिस लिऑन याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विनंती केली आहे की, आयपीएल संपताच सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी आणण्याची व्यवस्था केली जावी.
भारतात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इथली परिस्थितीही दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. सर्वांत जास्त काळ लॉकडाऊनमध्ये राहणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना आता पुन्हा लॉकडाऊनमध्ये राहावे लागू नये म्हणून ऑस्ट्रेलियन सरकार दक्षता घेत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन सरकार देशाच्या सीमा सील करण्याच्या विचारात आहे.
सरकारने हे पाऊल उचलण्याअगोदर आपण मायदेशी गेलेले बरे, असा विचार खेळाडू, समालोचक, प्रशिक्षक करत आहेत. बायोबबल खेळाडूंसाठी घातक ठरत असल्याचे चित्र आहे. बायोबबलला कंटाळून राजस्थानचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन हादेखील मायदेशी परतला. बायो-बबलमध्ये मानसिक कोंडमारा होत असल्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्याने सांगितले होते. आता ऑस्ट्रेलियन पंतप्रधानच हात वर करत असल्याने स्पर्धेचे भवितव्य धोक्यात आल्याचे मानले जात आहे.
आम्हाला माहीत आहे की, आपणापैकी बरेच जण स्पर्धा संपल्यानंतर आपल्या घरी कसे पोहोचणार याबद्दल घाबरून गेले आहात, जे नैसर्गिक आणि समजण्यासारखे आहे. आम्ही आपल्याला खात्री देतो, की यासंदर्भात आपण कशाचीही काळजी करू नये. आपण सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचू शकाल याची काळजी बीसीसीआय घेईल.
– हेमंग अमीन, सीओओ, आयपीएल