मुंबई – संघाच्या पराभवास एका खेळाडूस टार्गेट करणे योग्य नाही. तसेच सततच्या विरोधाचा हार्दिकच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे पराभवास त्याला सर्वस्वी जबाबदार धरू नये, असे सांगत मुंबई संघाचे फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्ड यांनी हार्दिकची पाठराखण केली.
क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचे कमी-जास्त प्रमाणात योगदान होत असते. त्यामुळे पराभवास केवळ एकाच खेळाडूला जबाबदार धरून त्याला टार्गेट करणे योग्य नाही, असे पोलार्ड यांनी मुंबई संघाचा चेन्नईविरुद्ध पराभव झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
हार्दिक हा आत्मविश्वास उंचावलेला खेळाडू आहे. तो आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये जसे चांगले दिवस असतात तसे वाईट दिवसांचाही सामना करावा लागतो. मुंबई इंडियन्स संघातील त्याचा प्रवास मी जवळून पाहिलेला आहे, असे पोलार्ड म्हणाले.
आयपीएलमध्ये त्याच्याकडून होत असलेल्या कामगिरीचा जास्त विचार करू नये, तो येत्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करू शकेल. ही स्पर्धा अजून सहा आठवडे दूर आहे, तो पर्यंत हार्दिक निश्चितच प्रभाव पाडेल, असा विश्वास पोलार्ड यांनी व्यक्त केला.
धोनी हा विश्वविख्यात फलंदाज
हार्दिकने अखेरच्या षटकांत दिलेल्या २६ धावांचा फटका आम्हाला बसला हे मान्य करताना पोलार्ड म्हणतात, समोर महेंद्रसिंग धोनीसारखा फलंदाज असताना कोणाकडूनही २० धावा दिल्या जाऊ शकतात. धोनी हा विश्वविख्यात फलंदाज आहे हे विसरता येणार नाही.