पुणे :- भारत ही सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची विकसित देश बनण्याकडे वाटचाल सुरू आहे. सर्व क्षेत्रामध्ये जगातील सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश आहे. पाण्याच्या क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश आपला असून 4 कोटी कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे देशात गुंतवणुकीला मोठे भविष्य असून स्वीडनने आणि एसकेएफ कंपनीने सर्वच क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी, असे आवाहन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केले.
एसकेएफ कंपनीच्या भारतातील शतकपूर्ती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री शेखावत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वीडनचे परराष्ट्र व्यापार सचिव हॅकन जेवरल, स्वीडनचे भारतातील राजदूत जॅन थेस्लेफ, मुंबई येथील महावाणिज्य दूत ॲना लेकवॉल आदी उपस्थित होते.
स्वीडनबरोबर भागीदारीसाठी महाराष्ट्र कटिबद्ध – उपमुख्यमंत्री फडणवीस
स्वीडनचे परराष्ट्र व्यापार सचिव हॅकन जेवरल म्हणाले, कंपनीचा 100 वर्षांचा प्रवास ही खूप मोठी बाब आहे. खऱ्या अर्थाने ही कंपनी भारतातील स्वीडनची राजदूत आहे. शाश्वत उत्पादन, कौशल्य विकास आणि सामाजिक समावेशनात मोठी भर घातली आहे. स्वीडन आणि भारताने औद्योगीक आणि उत्पादन क्षेत्राद्वारे राष्ट्रीय संपत्ती निर्माण केली आहे. आपल्याला भविष्यासाठी महत्वाकांक्षी रहायला हवे. दोन्ही देशांनी परस्पर औद्योगिक गुंतवणुकीसाठी अधिक प्रयत्नशील रहायला हवे. भविष्यकाळ हा हरित आणि शाश्वत विकासाचा राहणार असून त्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही ते म्हणाले.