आ. अमरनाथ राजूरकर यांची मागणी
नांदेड(प्रतिनिधी) : मोठा गवगवा करून हजारो कोटी रूपयांचे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे जिल्ह्यात निर्माण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. जिल्ह्यातील अनेक रस्ते या कामासाठी खोदून ठेवले आहेत. परंतु मागील दोन वर्षांपासून या कामांना कोणतीही गती देण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यात चिखल का चिखलात रस्ते अशी स्थिती निर्माण झाली असून त्यामुळे अनेकांचे बळी जात आहेत. हे थांबविण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व रस्त्यांची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर यांनी केली आहे.
या विषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी असे म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील 361 क्रमांकाच्या बोरीबुट्टी ते तुळजापूर रस्त्याचे काम जैसे थे परिस्थितीत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक इमारती या कामासाठी पाडण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला खोदकाम केले आहे. या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. नांदेडहून लातूरकडे जाणारा रस्ता जिवघेणा बनला आहे. या रस्त्याचे सोलापूर व लातूर जिल्ह्यात मोठे काम झाले आहे. बाजूच्या यवतमाळ जिल्ह्यात देखील कामाला गती मिळाली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात मात्र राष्ट्रीय महामार्गाचे या रस्त्यावरील एक मिटरसुद्धा काम झाले नाही. 222 क्रमांकाच्या कल्याण ते म्हैसा या राष्ट्रीय महामार्गावरील बारसगाव-भोकर-राहटी दरम्यान रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था आहे. हा सर्व रस्ता मागील दोन वर्षांपासून खोदून ठेवला आहे. पहिल्याच पावसामध्ये संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणे अशक्यप्राय आहे. हा जिवघेणा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. वारंवार ठेकेदार बदलून सुद्धा रस्त्याचे काम मात्र होत नाही ही बाब अत्यंत दुर्देवी आहे.
सिडको-शिराढोण-हाळदा-मुखेड,उस्माननगर-भोपाळवाडी-पांगरा-फुलवळ-गऊळ-दिग्रस-जांब या रस्त्यांची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. काही भागात सिमेंट काँक्रेटचे काम झाले आहे. तर काही भाग केवळ खोदून ठेवला आहे. यामुळे हे सर्व रस्ते जिवघेणे बनले आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती का मिळत नाही? या कामांवर निधी उपलब्ध नाही का? जर निधी उपलब्ध नसेल तर या कामांना सुरूवात का केली? असे एक नव्हे अनेक प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांना पडले आहेत. स्वतःला भाजपाचे नेते समजून घेणारे मंडळी या विषयावर मूळ गिळून का बसले आहेत? असा सवाल करीत जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी आ. अमरनाथ राजूरकर यांनी केली आहे.