नगर – जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या कोट्यावधीच्या जागा आहेत. या जागांच्या समोर अनेकांनी अतिक्रमण केलेले आहे. या अतिक्रमणाच्या प्रश्नावर जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर भूमिका घेतली आहे. हे सर्व अतिक्रमणे काढण्यासाठी आता प्रशासनाकडून व्यूहरचना आखली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व अनेक गावात जागा आहेत. मोक्याच्या ठिकाणी या सर्व जागा आहेत.
या जागांवर पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आदी इमारती उभ्या आहेत. या मोक्याच्या जागांना अतिक्रमणाने वेढा घातला असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिवदास पाटील यांना जिल्ह्यातील विविध भागात भेटी देत असताना समोर येत आहे. त्यामुळे त्यांनी हा मुद्दा गांभिर्याने घेतलेला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आता अतिक्रमणांबाबत कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केलेली आहे.