पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- पीएमपीची बसस्थानके, तसेच बस थांब्यांपासून ५० मीटर अंतरावर रिक्षाचालकांना रिक्षा अथवा इतर प्रवासी वाहन थांबविण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या नियमाला हरताळ फासत पीएमपीएमएलच्या मुख्य बसस्थानक परिसरात येऊन प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या, तसेच बसला अडथळा निर्माण करणाऱ्या सुमारे १६२० रिक्षांवर पीएमपी आणि आरटीओच्या संयुक्त पथकाने मागील तीन महिन्यांत कारवाई केली आहे. तसेच या रिक्षाचालकांकडून दंडही वसूल करण्यात आला आहे.
परिवहन महामंडळाचे चालक, प्रवासी व प्रवासी मंचाकडून पीएमपी प्रशासनाकडे याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने हे संयुक्त पथक नेमण्यात आले होते. शहरातील सर्व प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांवर पीएमपीची बसस्थानके, तसेच बस थांबे आहेत. अनेकदा वर्दळीच्या वेळी बसमध्ये गर्दी असल्याने प्रवासी पुढच्या बसची वाट पाहात असताना रिक्षाचालक, तसेच इतर प्रवासी वाहने पीएमपीच्या बसस्थानकावरच वाहने लावतात. बस आली तरीही वाहने काढत नाहीत.
परिणामी पीएमपी चालक रस्त्यावरील कोंडी लक्षात घेऊन बस न थांबवताच पुढे जातात अथवा रस्त्याच्या मधोमध बस उभी करतात. त्यामुळे रिक्षाच्या अडथळ्याने प्रवाशांनाही बसपर्यंत जात येत नाही. परिणामी बसेस न मिळाल्यास प्रवाशांना नाइलाजास्तव रिक्षा, तसेच इतर वाहनांतून प्रवास करावा लागतो. त्यामुळे पीएमपीचे आर्थिक नुकसान होते, तसेच प्रवाशांनाही मोठा भुर्दंड बसतो.
ही बाब लक्षात घेउन त्याअनुषंगाने नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक परिवहन महामंडळाच्या वाहतूक विभागाकडील पर्यवेक्षकीय सेवकांचे पथक तयार करण्यात आले असून, या पथकासमवेत प्रादेशिक परिवहन विभागाकडील (आरटीओ) वरिष्ठ अधिकारी देखील असतात.
परिवहन महामंडळाकडील ४ सेवक व १ आरटीओ अधिकाऱ्यांचे पुणे शहरासाठी १ व पिंपरी-चिंचवड शहरासाठी १ अशी दोन संयुक्त दक्षता पथके तयार करण्यात आली असून, मागील ३ महिन्यांत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएमएलच्या मुख्य बसस्थानकांच्या ५० मीटरच्या परिसरात येऊन नियम मोडणाऱ्या एकूण १,६२० रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
जानेवारी २०२४ – ५५३ रिक्षा
फेब्रुवारी २०२४ – ६२२ रिक्षा
२६ मार्च अखेर – ४४५ रिक्षा
स्वारगेट पोलिसांचीही कारवाई
पीएमपीच्या पथकासह स्वारगेट पोलीस स्टेशनकडून स्वारगेट बसस्थानकाच्या परिसरात वाहतुकीस अडथळा करणाऱ्या रिक्षा, ओला, उबेर, लक्झरी बस इ. वाहनांवर मोटार वाहन कायदा १९८८ नुसार जानेवारी २०२४ ते २५ मार्च या कालावधीत ५३० वाहनांवर कारवाई करून वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी एकूण ३,३२,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पीएमपीचे आवाहन
पीएमपीएमएलच्या बस स्थानकांच्या परिसरात रिक्षा व इतर खासगी वाहने दिसल्यास अशा वाहनांवर आरटीओ पथकामार्फत कारवाई करण्यात येणार असून, अपघाताची शक्यता असल्याने रिक्षा व इतर खासगी वाहनांनी बस स्थानकांच्या परिसरात त्यांची वाहने उभी करू नयेत, असे आवाहनही पीएमपीकडून करण्यात आले आहे.