-राहुल गोखले
सर्व क्षेत्रांना राजकारणाने ग्रासले असल्याने ही स्थिती आली आहे का; मूळातच राजकारण निकृष्ट होत असल्याने अशी अवस्था निर्माण झाली आहे का आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे नीतिमत्ता आणि नैतिकता याविषयीचा आग्रह कमी झाल्याने राजकीय आणि सामाजिक समस्या अधिक निर्माण होत आहेत का, असे सवाल पुढे येतात…
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच’, अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांची स्मृतिशताब्दी नुकतीच झाली आणि त्यानंतर पंधरा दिवसांत स्वातंत्र्य दिन साजरा झाला. ज्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी आणि सत्याग्रहींनी समर्पण केले ते स्वातंत्र्य देशाला मिळाले ते लढून. कोणत्याही देशाला स्वातंत्र्य सहज मिळत नसते आणि स्वराज्य स्थापन केल्यावर त्याचे रूपांतर सुराज्यात करणे देखील सोपे नसते. दोन्हीसाठी तितकीच मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणा लागत असतो.
पाकिस्तानसारख्या राष्ट्रांची निर्मिती देखील भारताबरोबर झाली कारण भारताचे विभाजन होऊनच पाकिस्तान निर्माण झाला. मात्र भारताच्या तुलनेत पाकिस्तान प्रगती आणि विकासाच्या बाबतीत पिछाडीस पडला. याचे मुख्य कारण म्हणजे नेतृत्वापाशी आवश्यक असणाऱ्या दूरदृष्टीचा अभाव. केवळ भारताविरुद्ध गरळ ओकून आणि काश्मीर मुद्द्यावरून भारताला लक्ष्य करून पाकिस्तानमधील लष्करी आणि राजकीय नेतृत्वाने आपले स्थान बळकट अवश्य केले. पण देशाला मात्र खाईत लोटले. भारताने जेव्हा शत्रूशी दोन हात करण्याची वेळ आली तेव्हा सरशी केली. मात्र सतत जनतेला शत्रूची अनाठायी भीती दाखवून केवळ नकारात्मक वातावरणात भारत फसला नाही. यामागे भारतातील राजकीय नेतृत्वाची दूरदृष्टी कारणीभूत आहे, तद्वत भारतातील जनतेची संयमित वृत्ती देखील कारणीभूत आहे. “यथा राजा तथा प्रजा’ अशी जुनी म्हण असली तरीही लोकशाहीत प्रजा आपला नेता निवडत असते.
तेव्हा मूळात लोकशाही राज्यव्यवस्था भारतात टिकून राहिली याचे श्रेय नेत्यांना आणि जनतेला द्यावे लागेल. पाकिस्तानमध्ये लोकशाही रुजलेली नाही. निवडणुका कितीही झाल्या तरी तेथे लष्कराचा वरचष्मा असतो, हे लपलेले नाही. भारतात जेव्हा लोकशाहीचा संकोच करण्याचे प्रयत्न झाले तेव्हा तेव्हा ते जनतेने मोडून काढल्याचा इतिहास आहे. तेव्हा स्वातंत्र्याला सात दशकांहून अधिक काळ होऊनही भारत विकासपथावर अग्रेसर आहे. याचे मूळ लोकशाही टिकण्यापासून जनतेची सजगता येथपर्यंत अनेक बाबींमध्ये आहे.
गेल्या 73 वर्षांत भारताने अनेक क्षेत्रांत नेत्रदीपक प्रगती केली आहे. भारताची अर्थव्यवस्था विस्तारत आहे. पायाभूत सुविधांमध्ये भारत प्रगती करीत आहे. नावीन्य आणि अभिनवता या बाबतीत भारतातील तरुण पिढी नवा विचार करीत आहे. मंगलयानसारख्या प्रयोगांमध्ये भारताने स्वयंसिद्धतेचा पुरावा दिला आहे. लष्करी सिद्धतेबाबत भारत सजग आहे आणि राफेल विमानांसारख्या लढाऊ विमानांनी भारताला अतिशय अत्याधुनिक आणि मजबूत केले आहे. साक्षरता, आरोग्य अशा क्षेत्रांत भारताने वाखाणण्यासारखी प्रगती केली आहे. औद्योगिक क्षेत्र भारतात वाढते आहे आणि स्टार्ट ऍप्सना चालना मिळते आहे. कृषी क्षेत्रात आधुनिकता येत आहे आणि देश अनेक बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. हे सगळे चित्र कोणालाही अभिमान आणि समाधान वाटावे असेच आहे, यात शंका नाही. पण जेव्हा कोणीही आपल्याशीच आपली तुलना करतो तेव्हा जी प्रगती समाधानकारक वाटते तीच तुलना इतरांशी केल्यावर मात्र कदाचित अंतर्मुख व्हावयास बाध्य ठरू शकते.
दुसऱ्या महायुद्धानंतर जपान बेचिराख झाला होता. पण राखेतून फिनिक्स पक्ष्याने भरारी घ्यावी तशी त्या देशाने घेतली. इस्रायलला भारताबरोबरच स्वातंत्र्य मिळाले. तेथे सर्व प्रकारची प्रतिकूलता असतानाही इस्रायलने अनेक क्षेत्रांत झेप घेतली. चीन हा भारताची कायम कुरापत काढणारा देश नि त्यामुळे चीनविषयी भारतीयांच्या मनामध्ये रोष असणे स्वाभाविक. 1962 मध्ये चीनने भारताला स्वप्नभंगाचा अनुभव दिला आणि अद्यापि चीनचा विस्तारवाद संपलेला नाही. मात्र त्याच चीनचा जागतिक अर्थकारणात केवढा मोठा वाटा आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही आणि भारत त्यापासून काही योजने दूर आहे, हेही नाकारता येणार नाही. तेव्हा एकीकडे पाकिस्तान, नेपाळ अशा राष्ट्रांशी तुलना केली तर भारताचे स्थान उजवे वाटेल; पण तीच तुलना जपान, चीन, अमेरिका, जर्मनी यांच्याशी केली तर भारताला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे याची जाणीव होईल. यातूनच एका अर्थाने मागे पडण्यास कारणे काय, असा विचार सुरू होऊ शकतो. कारणांचा शोध लागला की, उपायांचा मार्ग देखील दिसू शकतो.
भारताने प्रगती आणि विकासाचा मार्ग धरला आहे, हे नाकारता येणार नाही. तथापि, तरीही ती प्रगती ज्या वेगाने व्हावयास हवी ती तशी झालेली नाही, हेही मान्य करावयास हवे. याचे मूळ बहुधा भारतीय मानसिकतेतील “चलता है’ या मनोधारणेत असावे. उत्कृष्टतेचा ध्यास असणे आणि कामचलाऊ देखील सहन करणे यातील काय स्वीकारायचे यातील निवडीचा हा प्रश्न आहे. ज्या देशांनी देदीप्यमान प्रगती केली त्या देशांनी दुय्यम दर्जाचे काहीही त्याज्य ठरविले. मग ते शिक्षणाचे क्षेत्र असो, संशोधनाचे असो, किंवा कुठल्याही उत्पादनाचे असो. उत्कृष्टतेचा ध्यास असणे आणि उत्कृष्टतेसाठी शर्थ करणे हे चिकाटीची कसोटी पाहणारे असते. त्यात झोकून द्यावे लागते आणि प्रसंगी जननिंदेचे बाण सोसावे लागतात. हे तेव्हाच शक्य असते जेव्हा समाजाची मनोधारणा तशी बनते. कोणत्या क्षेत्राला वलय असावे याची परिमाणे समाजाने उचित पद्धतीने ठरवावी लागतात.
एरव्ही जी समाजाची मूलभूत जडणघडण करणारी क्षेत्र आहेत त्यांना वलय न मिळता दुय्यम दर्जा असल्यासारखे त्याकडे पाहिले जाऊ लागले तर पाया मजबूत न होता केवळ डोलारा उभा राहू शकतो. पण त्या डोलाऱ्याला जो भक्कमपणा आणि स्थायीपणा लागतो तसा तो येत नाही.