पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्यांची संख्याही अधिक
– मिलन म्हेत्रे
पुणे – राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस आता अनलॉक 4 मध्ये 19 सप्टेंबरपासून धावू लागल्या नंतर अन्य राज्यातून पुणे शहरात येण्याकरिता एसटीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे महामंडळाने आंतरराज्य बससेवेवर भर दिला असून विजापूर, गुलबर्गा, बिदर, गाणगापूर अशा गाड्यांना प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातून सातारा, सांगली, कोल्हापूर अशा जिल्ह्यांमधून येणाऱ्या एसटी प्रवाशांतही वाढ झाली आहे, असे स्वारगेट आगार व्यवस्थापक एस. एस. शिंदे यांनी सांगितले.
अर्थव्यवस्थेची घडी पूर्ववत होण्याच्या दृष्टीने लॉकऑन प्रक्रियेत अनेक गोष्टी सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बस म्हणजेच एसटीही सुरू करण्यात आली आहे. आता, अनलॉकच्या पाचव्या टप्यात राज्य सरकारने पूर्ण क्षमतेने एसटी सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे.
शहरातील स्वारगेट या सर्वात मोठ्या आगारातून जिल्ह्यासह राज्य, आंतरराज्य करोना प्रादुर्भावामुळे अन्य वाहनांनी प्रवास करण्यापेक्षा एसटी सेवा प्रवाशांना सुरक्षित वाटत आहे. यातून एसटी प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे.
दरम्यान, अन्य राज्य तसेच जिल्ह्यांतून पुणे शहरात येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असताना पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांची संख्या तुलनेने कमीच आहे. शहरात करोना बाधीत रुग्णांची वाढती संख्या हे यामागील एक कारण सांगितले जात आहे. परंतु, ज्या कारागिर, मजुर, कामगारांना पर्यायच नाही, असे शहरात येऊ लागले आहे. यातील बहुतांशी प्रवासी हे अन्य राज्य, जिल्ह्यातील आहेत.
पुणे-मुंबईत येण्यास चालक-वाहक तयार नाहीत
पुणे शहरात आणि मुंबईत येण्यास बाहेरी जिल्ह्यांतील चालक-वाहकांमध्ये नाराजी आहे. विशेषतः मुंबईला जाण्यास चालक-वाहन तयार नसल्याने त्यांना बडतर्फीचा इशारा दिला असल्याने अशा कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.
एसटी महामंडळाच्या आंतरराज्य बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच, अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांचीही संख्या वाढत आहे. या महिन्यांत पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या आणखी वाढू शकेल.
– एस. एस. शिंदे, आगार व्यवस्थापक, स्वारगेट, पुणे