Internet shutdown in Manipur – मणिपूर सरकारने बुधवारी चुराचंदपूर जिल्ह्यातील प्रचलित कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन तेथील इंटरनेट सेवा आणखी पाच दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
एका पोलिस कर्मचाऱ्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून तेथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यात आधीपासूनच इंटरनेट बंद आहे आणि त्यात आता या पाच दिवसांच्या नव्या बंदीची भर पडली आहे.
पोलिस अधीक्षक आणि उपायुक्तांची कार्यालये असलेल्या सरकारी संकुलात जमावाने घुसून गोळीबार केल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्यावेळी सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले होते. त्यामुळे हा जिल्हा पुन्हा तणावग्रस्त बनला आहे. मणिपुरच्या अनेक भागात पुरेसे सुरक्षा दल तैनात करूनही तेथे हिंसक प्रकार सुरूच आहेत.