नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील स्थगिती 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. संबंधित निर्णय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) शुक्रवारी जाहीर केला.
करोना संकटामुळे 23 मार्चपासून देशातील आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्यात आली. आंतरराष्ट्रीय सेवेवरील ती स्थगिती सातत्याने वाढवण्यात आली. याआधी 26 जूनला नवा आदेश जारी करत डीजीसीएने 15 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय सेवा बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले. आता ती मुदत महिना अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
अर्थात, वंदे भारत अभियानांतर्गत मर्यादित आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. ती यापुढेही कायम राहील. त्या अभियानांतर्गत परदेशांत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणले जात आहे. त्याशिवाय, परदेशी नागरिकांना त्यांच्या देशांमध्ये पाठवले जात आहे.