नवी दिल्ली – भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि 1983 सालच्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर विश्वविजेत्या संघातील सर्व सदस्य, बीसीसीआय तसेच भारतासह क्रिकेटविश्वानेही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
यशपाल यांनी बीसीसीआयच्या निवड समितीच्या सदस्यपदाची जबाबदारीही पार पाडली होती. भारताकडून यशपाल शर्मा यांनी 37 कसोटी सामन्यांमध्ये 1 हजार 606 धावा केल्या आहेत. यात 140 धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी 42 सामन्यात 28.48 च्या सरासरीने 883 धावा केल्या.
1983 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध विजय मिळवत थाटात प्रारंभ केला होता. त्यात शर्मा यांनी 89 धावांची अविश्वसनीय खेळी केली होती. एकवेळ संघाची धावसंख्या 3 बाद 76 अशी होती, त्यानंतरही भारताने 5 बाद 141 अशीच मजल मारली होती. मात्र, शर्मा यांनी 120 चेंडूंत 89 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला होता. याच स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमक 40 धावांची तसेच इंग्लंडविरुद्ध 61 धावांची खेळी करत शर्मा यांनी मोलाची कामगिरी केली होती.
1983 सालच्या विश्वविजेत्या संघातील शर्मा यांचे सर्व सहकारी खेळाडू, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व माजी कसोटीपटू राहुल द्रविड, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सध्याच्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यासह भारताच्या तसेच क्रिकेट खेळत असलेल्या सर्व देशांच्या आजी माजी क्रिकेटपटूंनी शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
कपिल देव यांना अश्रू अनावर
शर्मा यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर माध्यमांशी बोलताना भारताचे 1983 सालच्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार व महान क्रिकेटपटू कपिल देव यांना अश्रू अनावर झाले. त्यांना भावना इतक्या अनावर झाल्या होत्या की ते एकही शब्द उच्चारू शकले नाहीत. काही वेळाने सावरत त्यांनी मी माझा भाऊ गमावला असे एका वाक्यात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. विश्वकरंडक स्पर्धेच्या जवळपास प्रत्येक सामन्यात यशपाल यांनी मोलाची कामगिरी केली होती. त्यांच्यामुळे ही स्पर्धा जिंकणे शक्य झाले, असेही कपील म्हणाले.
दिलीप कुमार यांच्यामुळेच संधी
यशपाल शर्मा प्रसिद्ध दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचे फॅन होते. दिलीपकुमार यांनी एका रणजी सामन्यात शर्मा यांची कामगिरी पाहून बीसीसीआयचे तत्कालीन सर्वेसर्वा राजसिंग डूंगरपूर यांच्याकडे शब्द टाकला व त्यामुळेच शर्मा यांना भारताच्या संघात स्थान मिळाले. खुद्द शर्मा यांनीच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती.