पुणे, (डॉ. राजू गुरव) – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील (विद्या प्राधिकरण) अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत राजकारण शिगेला पोहोचले आहे. संचालकपदी “आयएएस’ अधिकाऱ्याच्या नियुक्तीनंतर इतर अधिकाऱ्यांची खांदेपालट सुरू आहे. यावरून अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येत आहे. आता प्राधिकरण हे अधिकाऱ्यांच्या राजकारणाचा अड्डाच झाल्याचे चित्र आहे.
सहसंचालकांना विद्या प्राधिकरण संचालकपदी पदोन्नती देण्याऐवजी शासनाने थेट “आयएएस’ अधिकारी एम. डी.सिंह यांची संचालकपदी गेल्या महिन्यात नियुक्ती केली. नवीन संचालकांना विद्या प्राधिकरणाचा खरा कारभार समजायला काही महिने लागणार आहे. मात्र, त्यांच्या कानाला लागण्यासाठी काही अधिकारीच अग्रेसर आहेत. त्यामुळे संचालकांकडून धक्कादायक निर्णय घेण्याचे प्रकार वाढले आहेत.
प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांचा कालावधी संपुष्टात आणलेला असतानाही विभाग संवर्ग बदलून काही ठराविक अधिकाऱ्यांना दोन-तीन आठवड्यांसाठी कामाची गरज पाहून प्राधिकरणात बोलावले जात आहे. आस्थापना विभागाला अंधारात ठेवूनच या अधिकाऱ्यांचे परस्पर आदेश काढले जात आहेत. प्रशासनाविरुद्ध प्रशिक्षण विभाग असा अधिकाऱ्यांमध्ये सामना रंगू लागला आहे. यापुढे नवीन संचालकही हतबल झाले आहेत.
आता काही अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे विभागाच बदलण्यात येत आहेत. प्रभारी सहसंचालक व प्राचार्य डॉ. विलास पाटील यांच्याकडे मानव संसाधन विभाग काढून सामाजिक शास्त्र, कला व क्रीडा विभागाचे कामकाज सोपवले आहे. शिक्षण उपसंचालक व रमाकांत काठमोरे यांच्याकडे मानव संसाधन विभागाची सूत्रे सोपवली आहेत. वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. नेहा बेलसरे यांच्याकडे सेवापूर्व शिक्षण, बालशिक्षण व मानसशास्त्र या विभागाचे कामकाज सोपवले आहे. सुधारित विभाग वाटपाबाबतचे आदेश संचालक एम. डी. सिंह यांनी काढले आहेत. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
सहसंचालक पदावरून वाद उफाळले
येथे प्रशासनासाठी एक व प्रशिक्षण वर्गासाठी एक अशी सहसंचालकांची दोन पदे आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार डॉ. विलास पाटील यांच्याकडे गेल्या काही महिन्यांपासून सहसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. आता तो काढून व सेवाज्येष्ठता डावलून शिक्षण उपसंचालक काठमोरे यांच्याकडे सोपवण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, यावरून अधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत.