मुंबई – लोकांच्या मनात जबरदस्त भीती आहे. रेड झोनमधून इतर जिल्ह्यामध्ये माणसं पाठवू नका, कोरोना पसरवू नका, अशा तक्रारी आमच्याकडे आल्या. काही लोकांनी विरोध केल्याने आम्ही तात्पुरती आंतरजिल्हा एसटीचा निर्णय स्थगित केला आहे, असे स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले. तसेच आंतरजिल्ह्यात टप्प्याटप्प्याने सेवा सुरु करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात अडकलेल्या लोकांना एसटी मोफत बससेवा देणार असल्याचे अनिल परब यांनी शनिवारी (9 मे) जाहीर केले होते. परंतु दुसऱ्या दिवशीच म्हणजे 10 मे रोजी मदत व पुनर्वसन विभागाने या निर्णयात बदल केले. या विभागाच्या पत्रकात महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेल्या इतर राज्यातील प्रवाशांना महाराष्ट्रातील त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि इतर राज्यात अडकलेले लोक जे महाराष्ट्राच्या सीमेवर आले आहेत त्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यासाठीच मोफत एसटी प्रवास असेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊन सरकारच्या विभागांमध्येच समन्वय नसल्याचे समोर आले. यावर अनिल परब यांनी आज (11 मे) माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले.
“मोफत एसटी बस सेवेचा निर्णय झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच मदत आणि पुनर्वसन खात्याची प्रेस नोट निघाली. त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ही सेवा परराज्याच्या सीमेवर जाणाऱ्यांसाठी आहे. त्यामधून आंतरजिल्ह्याचा उल्लेख काढून टाकलेला आहे. म्हणून आंतरजिल्ह्याची सेवा सुरु झाली नाही. आता प्रथम पायी चालत जाणाऱ्यांना सीमेपर्यंत सोडण्यात येणार आहे, असे परब यांनी सांगितले.
आंतरजिल्ह्यात अडकलेल्यांना टप्प्याटप्प्याने सेवा सुरु करण्याचा विचार आहे. याबाबत बैठक बोलावली असून ही सेवा टप्प्याटप्प्या सुरु करण्याचा विचार आहे. त्याचे अंतिम स्वरुप थोड्या वेळाने देऊ. मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन, याचं योग्य नियोजन करुन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन आंतरजिल्ह्यात अडकलेल्यांना आपापल्या ठिकाणी सोडू.
5000 लोकांना सीमेवर सोडले
एसटीने एका दिवसात जवळपास पाच हजार लोकांना परराज्याच्या सीमेवर सोडल्याचे अनिल परब यांनी सांगितले. “जे लोक परराज्याच्या सीमेवर जाऊ इच्छित आहे, त्यांना आजही एसटी मोफत आहे. गेल्या दोन दिवसांपासून जे चित्र उभे राहिले होते जे लोक चालत निघाले आहेत, अशा लोकांना आम्ही एसटीच्या माध्यमातून आपल्या राज्याच्या सीमेवर सोडण्याचे काम केले आहे. काल एका दिवसात 250 ते 275 बसमधून जवळपास 5000 लोक परराज्याच्या सीमेवर सोडले. तर तीन हजार प्रवाशांना आपल्या राज्याच्या सीमेवरुन त्यांच्या जिल्ह्यात सोडले, अशी माहिती त्यांनी दिली.