पिंपरी, दि. 16 (प्रतिनिधी) -पपरी-चिंचवड शहर आणि मावळातील पवना धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे धरणातून 10 हजार क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात करण्यात आले आहे. शहरातून वाहणाऱ्या पवना नदी आणि मुळा नदी दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. पावसामुळे पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक रस्ते आणि सखल भाग जलमय झाले आहेत. यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे.
शहरातील पाणी घुसण्याच्या परिसरात अग्निशामक दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी असे 50 जणांचे पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच वेळ पडल्यास नदी लगतच्या भागातील नागरिकांना परिसरातील शाळांमध्ये स्थलांतर करण्याचीही व्यवस्था महापालिकेने केली आहे. पूर परिस्थतीवर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
चिंचवड, पिंपरी, रावेत, निगडी, भोसरी, डांगे चौक, थेरगाव, वाकड, सांगवी आदी परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत. रावेत येथील रस्ता, वाल्हेकरवाडी येथील जाधव घाट परिसर, चिंचवड येथील शांतीबन सोसायटीसमोरील रस्ता, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहासमोरील रस्ता, दर्शन हॉल समोरील रस्ता, चिंचवडस्टेशन येथील विजय सेल्स समोरील रस्ता पूर्ण जलमय झाला होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नदीपात्राची पाहणी
पवना धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि पावसाची सुरू असलेल्या सतंतधारेमुळे पूराची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, अग्निशामक विभागाचे मुख्य अधिकारी किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, कार्यकारी अभियंता थॉमस नऱ्होना आदी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी नदी लगतच्या परिसराची पाहणी केली. तसेच यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
भुयारी मार्गात पाणी
आकुर्डी येथील रेल्वे भुयारी, वाकड येथील भूमकर चौक, रावेत येथील भुयारी मार्गात पाणी साठले होते. त्यात खड्ड्यांची भर होती. त्यामुळे येथून वाहने घेऊन जाताना चालकांची चांगलीच कसरत झाली.
पवना धरणातील विसर्ग वाढल्यास नदी काठच्या परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे पालिकेची सर्व यंत्रणा अलर्ट असून विविध भागात पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. नदी काठच्या भागातील रहिवाशांना स्थलांतरित करण्याची वेळ आली तरी परिसरातील शाळांमध्ये चोख व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची मदत घेण्यात येणार आहे.
– उल्हास जगताप, अतिरिक्त आयुक्त, मनपा
आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी 24 तास तैनात
पवना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. तसेच आणखी दोन दिवस पाऊस जोर कायम असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी सतर्क झाले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना 24 तास लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदी पात्रातील पाणी वाढल्यास त्वरीत संबंधित परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कंट्रोल विभागातही दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.