दत्तात्रय आंबुलकर
पश्चिम विदर्भात बालमृत्यू व कुपोषण यामुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या मेळघाटमध्ये गेली दोन दशके राहून वैद्यकीय सेवा देत असलेल्या डॉ. कविता सातव या स्थानिक कोरकू वनवासींसाठी आशास्थान ठरल्या आहेत. एमएस (नेत्रचिकित्सा) ही वैद्यकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी घेतलेल्या डॉ. कविता यांनी मेळघाटमधील 20 हजारांहून जास्त वनवासी रुग्णांना अंधत्व येण्यापासून वाचविले आहे.
डॉ. कविता या मूळच्या विदर्भातील अकोला येथील राहणाऱ्या. त्यांची आई प्राथमिक शिक्षिका होत्या तर वडील वनखात्यात कार्यरत होते. या पार्श्वभूमीवर नेत्रचिकित्सेमध्ये एमएस असूनही डॉ. कविता यांनी शहरामध्ये रुग्णालय थाटण्याचा विचार न करता विवाहानंतर लगेच म्हणजे 1998 पासून मेळघाटात काम करण्याचे निश्चित केले. अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा या तालुक्यात पसरलेल्या आणि दीडशेहून अधिक वनवासी पाडे व गावे असणाऱ्या मेळघाटात काम करण्याचे त्यांनी निश्चित केले. मात्र या ठिकाणी काम करणे तसे सोपे नव्हते.
मुळात डॉक्टर अशी काही संकल्पना असते हेच तेथील वनवासींना माहीत नव्हते. त्यातही डोळ्यांसाठी वेगळा डॉक्टर असतो हे तर दूरच राहिले. त्यामुळे डॉ. कविता यांनी मेळघाटात डोळ्यांचा दवाखाना सुरू केल्यानंतरच्या पहिल्या एक ते दोन वर्ष त्यांच्याकडे कुणी रुग्ण उपचारासाठी फिरकला नाही. अशा स्थितीत आपणच वनवासी रुग्णांकडे जायला हवे याची खुणगाठ बांधत त्यांनी तेथील 50 हून अधिक गावांना भेटी दिल्या.
परंपरा आणि अंधश्रद्धेमुळे मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी वनवासी मंडळी पुढे येत नसत. अशा कठीण प्रसंगी डॉ. कविता यांनी वनवासींना त्याचे फायदे सांगून त्यांना राजी केले व त्यांच्यावर मोफत स्वरूपात यशस्वी मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या. परिणामी या रुग्णांना वा त्यांचे नातेवाईक व गावकऱ्यांना गरजू रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे वास्तविक फायदे स्पष्ट होऊ लागले.
यामुळे अनेक वनवासी मोततिबिंदू शस्त्रक्रियेसाठी तयार होऊ लागले. या वाढत्या प्रतिसादामुळे डॉ. कविता यांनी हजारो मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्याकडे मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांपैकी 65 टक्क्यांपेक्षा जास्त वनवासी रुग्ण हे स्थानिक कोरकू समाजाचे असतात. त्यांना त्यांच्या स्थानिक बोलीभाषेत उपचार समजावून सांगण्यासाठी डॉ. कविता कोरकू बोली शिकल्या व आज त्या या रुग्णांशी सहजतेने संवाद साधू शकतात.
डॉ. कविता यांचे पती डॉ. आशिष हेही एमडी असून वनवासींपर्यंत आरोग्यसेवा नेण्याचे त्यांचे स्वप्न होते ते या निमित्ताने पूर्ण झाले आहे. सर्वसाधारणपणे तरुण व नवागत डॉक्टर मंडळी ही ग्रामीण भागात जाण्यास तयार नसतात मात्र या डॉक्टर दाम्पत्यांनी एक सेवा व्रत स्वरूपात मेळघाटात काम करण्यास सुरुवात करून वनवासी रुग्णांसाठी सातत्याने 20 वर्षे काम केल्याने आज लक्षणीय स्वरूपात तरुण डॉक्टरही मेळघाटच्या वनवासी भागात रुग्णसेवा करण्याचा डोळस निर्णय घेत आहेत.