आजी-नातीवर अंत्यसंस्कार: लेकीची मृत्यूशी झुंज सुरूच
पिंपरी – पोटापाण्यासाठी भोसरीत वास्तव्यास असलेल्या कोतवाल आणि काकडे कुटुंबियांवर रोहित्राच्या स्फोटामुळे शनिवारी (दि. 5) काळाने घाला घातला. या स्फोटात दिलीप कोतवाल यांनी पत्नी व नात गमावली आहे. घरातील कर्ती व्यक्ती गेल्याने दिलीप कोतवाल यांना मानसिक धक्का बसला आहे. एकुलत्या एक गतीमंद मुलाचे कसे होणार या काळजीने ते पुरते कोलमडून गेले आहेत.
इंद्रायणीनगरातील राजवाड्यातील बिल्डिंग क्रमांक 2 जवळील विद्युत रोहित्राचा शनिवारी (दि. 5) दुपारी दीडच्या सुमारास स्फोट झाला. या आगीत शंभर टक्के भाजलेल्या शारदा कोतवाल आणि पाच महिन्यांची नात शिवानी काकडे यांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी (दि. 6) मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर त्यांची मुलगी हर्षदा सचिन काकडे (वय 32) यांची मृत्युशी झुंज सुरू आहे.
दिलीप कोतवाल यांचे मूळगाव चऱ्होली असून, कामानिमित्त कोतवाल कुटुंबियांचे इंद्रायणीनगर सेक्टर दोनमधील राजवाडा इमारतीत वास्तव्य आहे. बजाज ऑटो कंपनीतून सेवानिवृत्तीनंतर कुदळवाडीत कोतवाल यांचे छोटे स्क्रॅप शॉप आहे. इंद्रायणीनगरमधील घरात दिलीप कोतवाल, त्यांच्या पत्नी शारदा, एक गतिमंद मुलगा 22 वर्षांपासून राहतात. तर विवाहित मुलगी हर्षदा ही पाच महिन्यांच्या शिवानीसह माहेरीच होत्या. शनिवारी (दि. 5) दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या स्फोटात आजी व नातीचा मृत्यू झाल्याने, काळाने कोतवाल कुटुंबाचे सर्वस्व हिरावून नेले आहे. आता केवळ दिलीप कोतवाल आणि त्यांचा पंचवीस वर्षांचा मुलगा असे घरातील दोनच सदस्य आहेत. हर्षदा काकडे यांची मृत्युशी झुंज सुरुच आहे. काय हवे नको ते पाहणारी पत्नीची साथ सुटल्याने, या गतीमंद मुलाच्या भविष्याची चिंता त्यांना सतावू लागली आहे. तर जावई सचिन काकडे यांनीदेखील या घटनेत आपली मुलगी गमावली आहे.
शनिवारी दुपारपर्यंत हसुन-खेळून असलेले आणि सर्वांशी मिळून-मिसळून वागणाऱ्या कोतवाल कुटुंबियांचे काही तासांत होत्याचे नव्हते झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा
इंद्रायणीनगर, भोसरीतील रोहित्राच्या स्फोटात दोघींचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेला महावितरणचे अधिकारी जबाबदार आहेत. निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागल्याने, महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच मृतांच्या नातेवाईकांना एका मृत्यूसाठी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नंदकिशोर जगदाळे यांनी केली आहे. पक्षाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात विविध तांत्रिक मुद्दे उपस्थित केले आहेत. या रोहित्रावर या भागातील वीजपुरवठ्याचा 500 ते 550 केव्हीए इतका वीजदाब होता. या भागात याठिकाणी पूर्वी 325 केव्हीए क्षमतेचे रोहित्र होते. मात्र, नव्याने बसविलेल्या रोहित्राची क्षमता 200 केव्हीए एवढी होती.
भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि अभियंता यांनी या रोहित्राची क्षमता न तपासताच रोहित्र बसविण्याची परवानगी दिल्यानेच ही मनुष्यहानी झाली आहे.
रोहित्राचे नाना-नानी पार्कमध्ये स्थलांतर
दिलीप कोतवाल यांनी येथील रोहित्राला विरोध केल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तशी स्थानिक पोलीस ठाण्याला दिली होती. त्यानंतर स्थानिक नगरसेवकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटविला होता. त्यानंतर ही घटना घडल्याने महावितरणच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोन जणांच्या बळीनंतर या रोहित्राची जागा बदलून, ते नाना-नानी पार्क येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.