नवी दिल्ली – किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर नोव्हेंबर महिन्यात थोडासा वाढून 4.91 टक्के इतका झाला आहे. या महिन्यात काही अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे एकूण महागाईचा दर वाढला असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून दिसून येते.
ऑक्टोबर महिन्यात या महागाईचा दर 4.48 टक्के होता. तर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये किरकोळ महागाईचा दर 6.93 टक्के इतका होता. रिझर्व्ह बॅंक आपले पतधोरण जाहीर करताना किरकोळ महागाईच्या आकडेवारीचा विचार करीत असते. रिझर्व्ह बॅंकेने किरकोळ महागाईचा दर 4 टक्क्यांच्या आत रोखण्याचा संकल्प केला असला तरी या महागाईचा दर त्यापेक्षा जास्त पातळीवर आहे. प्रदिर्घ काळ इंधनाचे दर जास्त असल्यामुळे वाहतूकीचा खर्च वाढून महागाईचा दर वाढला असल्याचे समजले जाते.
आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत ही मागणी वाढत जाईल आणि नंतर कमी होईल असे मत रिझर्व्ह बॅंकेने पतधोरण जाहीर करताना व्यक्त केले होते. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या पतधोरणात महागाईमुळे रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करण्याची अपेक्षा होती. मात्र अर्थव्यवस्था आणखी पूर्वपदावर आली नसल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने तूर्त व्याजदर पूर्वीच्या पातळीवर कायम ठेवले आहेत. आगामी काळात रिझर्व्ह बॅंकेला व्याजदरात वाढ करण्याशिवाय पर्याय नाही असे बऱ्याच विश्लेषकांना वाटते.