– समीर भुजबळ
वाल्हे -ग्रामीण भागातील गोरगरीब जनता आगोदर करोना संकटापासून मागील वर्षांपासून संकटात सापडली असतानाच, जगण्यासाठी जीवनावश्यक असलेल्या सर्वच वस्तूची होत असलेल्या दरवाढीने, कष्टकरी जनता भरडून निघत आहे.
एकीकडे हाताला काम नाही तर दुसरीकडे महागाई गगनाला टेकली असूनही याबाबत ना सत्ताधारी ना विरोधीपक्ष आवाज उठवत नसल्याने सर्वसामन्य जनतेला कोणीही वाली नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
खाद्यतेलामध्ये शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन आदी तेलाचा वापर करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच मोहरी तेलाचाही वापर अनेक राज्यांत खाद्यतेल म्हणून मोठ्या प्रमाणात वापरतात; मात्र सर्वच खाद्यतेलाचे भाजारभाव मागील काही दिवसांपासून दुप्पट झाले आहेत.
त्यामुळे ज्या घरात दरमहा पाच लिटर तेल वापरले जाते त्या घरी दोन ते तीन लिटर तेल वापरण्यास सुरवात झाली आहे. किराणामालातील अनेक वस्तूचे भाव मागील वर्षभरात अनेक पटीने वाढले आहेत. तेल, डाळीचे भाव गगनाला टेकले आहे.
शेतमजूर महिलेला एक लिटर तेलाचा पुडा खरेदी करणाऱ्यांसाठी दिवसभर उन्हातान्हात घाम गाळवा लागतो; त्यानंतर मिळालेला रोज एक लिटर तेल पुड्यासाठी द्यावा लागत आहे त्यामुळे आगोदर बेजार झालेली जनता, वाढत्या महागाईमुळे मेटाकुटीस आली आहे.
जेवणावळी, हॉटेल, धाब्यावर मांसाहारीपेक्षा शाकाहारी जेवण महागले असून अंडाकरीला 80 रुपये तर दाल फ्रायला 120 ते 130 रुपये मोजावे लागत आहे. करोनामध्ये माहागाईनेसुद्धा कळस गाठल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
जगावे की मरावे?
पेट्रोल, डीझेलच्या किमतीने शंभरी गाठल्याने याचा परिणाम वाहतुकीचे दर वाढल्याने आपसुकच अन्नधान्याच्या किमतीत मोठी वाढ केली. लॉकडाऊनमध्ये हाताला काम नाही तर शेतीपयोगी मशागतीच्या कामाला सुरुवात झाली असून महिलांना 100 ते 200 रुपये तर पुरुषांना 200 ते 300 रुपये रोज मिळतो.
तर तेलाच्या किमतीमध्ये सोयाबीन तेल 155 ते 175 रुपये प्रति लीटर पर्यंत पोहोचले आहे. तुरीची डाळ 110 रुपये किलो, मिरचीपासून तर मसाल्याच्या पदार्थापर्यंत सर्वच जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढले. पालेभाज्यासुद्धा कडाडल्या आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी जगावे की मारावे, हा प्रश्न निर्माण झाला.