मुंबई : राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. अनेक जिल्ह्यात रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य साकारून काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. मात्र काल राज्यात झालेल्या अनलॉकच्या गोंधळामुळे सरकारला तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. यावरच आज पुन्हा एकदा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे.
राज्यातील काही जिल्ह्यात परिस्थिती निवळत आहे. याचाच विचार करून आज मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव देण्यात आला असून दुपारपर्यंत अधिसूचना निघेल अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटविण्यात आल्याच्या विजय वडेट्टीवार यांच्या घोषणेने गुरुवारी गोंधळ उडाला होता. यामुळे सारे निर्बंध शिथिल झाले, असे चित्र निर्माण झाले होते. पण असा कोणताही निर्णयच झाला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिले.
“अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून त्यांची संमती मिळाल्यानंतर अधिसूचना निघेल. जिल्ह्यातील परिस्थितीनुसार ते लागू होईल,” असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “विरोधक म्हणून त्यांची भूमिका योग्य असून त्यांना ती मांडावीच लागते. पण यामध्ये श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. सरकार म्हणून जे काही करावं लागतं ते आम्ही करत असतो”.