पिंपरी – गेले दोन वर्ष करोना निर्बंधामुळे लग्न सोहळे घरच्या घरी पार पडत होते. यावर्षी मात्र शासनाचे निर्बंध नसल्याने लग्न सोहळे धूमधडाक्यात सुरू झाले आहे. अनेक मंगल कार्यालये, सभागृह हाऊसफुल आहेत. यामुळे व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. असे असले तरी दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या महागाईमुळे यंदा लग्नसराईवर महागाईचे संकट आहे.
मंगल कार्यालये, दागिने, कपडे यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. तर लग्नासाठी लागणारा किराणा, रुखवतात ठेवण्यात येणार फ्रीज, कपाट, कॉट, वॉशिंग मशीन, एसी, कुलर याचे भावही प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. यासोबतच मंगल कार्यालयाचेही भाडे वाढले आहे. केटरर्स, डेकोरेशनवाले आणि फोटोग्राफर यांनीही आपले भाव वाढविले आहेत.
सोन्याचा दर 50 हजारांच्या आसपास आहे. पाहुण्यांनी मंगल कार्यालये, तसेच मंडपे खचाखच भरून जात आहेत. यामुळे मंडपवाले, डेकोरेशन वाले, बॅंडवाले, केटर्स, वाजंत्री, स्वयंपाकी यांचा धंदा जोरात आहे. तसेच लग्नासाठी जे काही साहित्य लागते त्याची लग्नाच्या अनुषंगाने लागणाऱ्या वस्तूंचे मागणी वाढल्यामुळे व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र वाढत्या महागाईने वधू-वर पिते त्रस्त आहेत.
सोने आवाक्याबाहेर
रशिय-युक्रेन युद्धानंतर सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. अगदी दोन तोळ्याचे मंगळसूत्र व इतर आवश्यक दागिने घ्यायचे झाल्यास हाच खर्च एक ते दीड लाखांच्या पुढे जातो. त्यामुळे लग्न करणे दिवसें-दिवस खर्चिक होत चालले आहे.
जेवणही महागले
सातत्याने महागाई वाढत असल्याने आता मंगल कार्यालयातील जेवणाच्या ताटाचे देखील दर वाढले आहेत. सर्वसामान्यपणे दोन भाज्या, पुरी, डाळ-भात व स्वीट असलेल्या एका ताटासाठी 250 रुपये आकारले जात होते. मात्र त्यामध्ये आता वाढ झाली असून याच एका ताटासाठी सुमारे 350 रुपये मोजावे लागत आहे. तर बुफे जेवणासाठी 800 ते 2000 रुपये ताटाप्रमाणे पैसे आकारले जात आहेत.
सामूहिक विवाह सोहळ्यांची आवश्यकता
गेल्या दहा वर्षांमध्ये सामूहिक विवाह सोहळा ही संकल्पना मागे पडत चालली आहे. सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये खर्च कमी होत असल्याने वधू पित्यांना दिलासा मिळत होता. मात्र, मुलांची हौस आणि स्टेटसला शोभावे यासाठी कर्ज काढून मुला-मुलींची लग्न मोठ्या थाटात लावली जात आहे. ग्रामीण भागांतील काही ठिकाणी अजूनही सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा आहे. आता वाढत्या महागाईत देखील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणे आवश्यक आहे.
===============