कोलकाता – पहिल्या सामन्यात सहज विजय मिळवलेल्या भारतीय संघाला आज येथे होत असलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा टी-20 सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 6 गडी राखून विजय मिळवला होता.
भारतीय संघाबाबत बोलायचे झाले तर फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व नेतृत्व या सर्वच स्तरावर सरस कामगिरी झाली. याउलट वेस्ट इंडीजच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडीजच्या निकोलस पूरन व कर्णधार कॅरन पोलार्डने केलेल्या खेळीच्या जोरावर त्यांना दीडशतकी धावा करता आल्या. मात्र, त्यांच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखताना भारताच्या फलंदाजांनी हे आव्हान सहज पार करत विजय प्राप्त केला. आता एकदिवसीय सामन्यांची मालिका भारतीय संघाने जिंकली होती व त्यातही वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना आलेल्या अपयशामुळे त्यांची टी-20 मालिकेसाठीही मानसिकता नकारात्मकच दिसून आली.
नियमित कर्णधार पोलार्ड संघात परतल्यावरही त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. निकोलस पूरन वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला जबाबदारीने खेळ करता आला नाही. जी परिस्थिती त्यांची फलंदाजीत झाली तीच गत त्यांची गोलंदाजीतही झाली. या मालिकेत आता थोडीफार प्रतिष्ठा जपण्यासाठी वेस्ट इंडीजला दुसरा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे.
विराट कोहलीच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह
माजी कर्णधार विराट कोहली याच्या सुमार कामगिरीवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. गेल्या दोन वर्षांत त्याच्या बॅटमधून मोठी खेळी झालेली नाही. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही त्याने 8, 18 व 0 अशी निराशाजनक कामगिरी केली होती. तसेच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीतही तो अवघ्या 17 धावा काढून बाद झाला, त्यामुळे आता तो भरात येणार का संघात त्याच्या जागी अन्य कोणा खेळाडूला संधी दिली जाणार याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.
एकदिवसीय मालिका भारतीय संघाने 3-0 असा निर्विवाद विजय प्राप्त केला होता. तसेच आता भारतीय संघाला या दुसऱ्या सामन्यासह ही मालिकाही जिंकण्याची नामी संधी आहे. या सामन्यात संघासह असलेले सेकंड बेंचमधील खेळाडू ऋतुराज गायकवाड व अन्य राखीव खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.