ठाणे – ठाणे महापालिका निवडणुकीत आघाडी नकोच अशी ताठर भूमिका शिवसेनेने घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी शिवसेनेला सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. त्यांच्या या सल्ल्यावर शिवसेनेचे एकनाथ शिंदेनीही उत्तर दिले आहे. ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना एकला चालो रेच्या भूमिकेत असेल असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नवी मुंबई, उल्हासनगर आणि जिल्ह्यातील इतर निवडणुकांसाठीदेखील आघाडी करायची नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी घेतल्याचे विश्वसनीय वृत्त असून ठाण्यात या दोन पक्षांत सुरू असलेला हा अहंवाद जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये मात्र भाजपच्या पथ्यावर पडेल या विचाराने या दोन्ही पक्षांतील स्थानिक पदाधिकारी हवालदिल झाले आहेत. ठाण्यातील वाद मिटला नाही तरी आम्हाला आघाडी हवी आहे, असे आर्जव करत शिवसेनेच्या नवी मुंबईतील काही नेत्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दार ठोठावल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
पालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीसंबंधी बोलताना आव्हाड म्हणाले की,मी पहिल्या दिवसापासून आघाडी झाली पाहिजे असं सांगत आहे. आघाडी दोघांच्याही हिताची आहे. काही ठिकाणी त्यांच्या तर काही ठिकाणी आमच्या हिताची आहे. आपण एकमेकांचं हित पाहिलं पाहिजे. उगाच अंहकारामुळे हातचं सगळं घालवून बसायचं योग्य नाही. त्यामुळे माझा हात आघाडीसाठी नेहमीच पुढे ओ. तर.शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. दोन्ही पक्षाच्या लोकांनी सामंजसपणाची भूमिका घेणं आवश्यक असतं. तसंच वरिष्ठांनी चर्चा करताना किंवा भाष्य करताना महाविकास आघाडीत तसंच स्थानिक पातळीवर मन दुखावलं जाईल असं भाष्य करु नये. मी कधीही महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसविरोधात भाष्य केलेलं नीा, असे शिंदे म्हणाले.