त्रिनिदाद :- कसोटी व एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडिज विरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज बनला आहे. यजमान वेस्ट इंडिजचा संघ घरच्या मैदानावर खेळत असला तरीही या मालिकेतही भारतीय संघाचीच बाजू वरचढ राहणार आहे.
रोहित शर्मा, विराट कोहलीसह अन्य काही वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून संघातील नवोदितांना आपली छाप पाडण्याची नामी संधी मिळाली आहे.
रोहित व कोहली नसले तरीही भारताची फलंदाजी इशान किशन, शुभमन गिल, कर्णधार हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन व तिलक वर्मा अशी भक्कम आहे. गोलंदाजीतही कुलदीप दायव, यजुवेंद्र चहल, अक्सर पटेल, मुकेश कुमार, उमरान मलिक, अर्शदीप सिंग व आवेश खान असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
त्यातही अर्शदीप व मुकेश कुमारच अंतिम संघात खेळतील असेच चिन्ह आहे. फिरकीची मदार रवींद्र जडेजा संघात नसल्याने कुलदीप व अक्सर यांच्यावरच राहणार आहे. चहलसह नवोदित रवी बिष्णोई यालाही संधी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
दुसरीकडे वेस्ट इंडिजबाबत बोलायचे तर एकदिवसीय मालिकेत सरस कामगिरी केल्यामुळे कर्णधार शाई होपला टी-20 मालिकेतही स्थान देण्यात आल्याने त्यांची फलंदाजी मजबूत बनली आहे.
तसेच अमेरिकेत पार पडलेल्या मेजर क्रिकेट लीगच्या अंतिम लढतीत मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कला विजेतेपद मिळवून देताना 55 चेंडूत 137 धावांची खेळी करणारा निकोलस पूरन संघात असल्याने भारतीय गोलंदाजांसमोर मोठे आव्हान असेल.
त्यांच्या टी-20 संघाची कामगिरी गेल्या मोसमापासून संमिश्र राहिली असली तरीही कर्णधार रोवमन पॉवेलचा संघ भारताला चांगली लढत देईल अशी अपेक्षा आहे.
तिलक वर्माकडे लक्ष राहणार…
यंदाच्या मोसमातील आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्ससाठी सातत्याने धावा केलेला तिलक वर्मा याला या मालिकेत संधी देण्यात आली आहे. तो भरात असतानाच त्याला मिळालेल्या संधीचा तो किती लाभ घेतो यावरच त्याचे पुढील काळातील टी-20 संघातील स्थान निश्चित होणार आहे.