पुणे : भारताने श्रीलंकेविरुद्धच्या तिस-या आणि निर्णायक टी-२० सामन्यात जबरदस्त कामगिरी करत दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यावर सरस कामगिरी करत श्रीलंकेवर ७८ धावांनी विजय संपादन केला. या विजयासह भारताने तीन सामन्याची मालिका २-० ने खिशात घातली. पहिला सामना पावसामुळं अनिर्णित राहिला होता.
Saini picks up his THIRD. Sri Lanka are all out for 123 runs.#TeamIndia win by 78 runs and win the series 2-0 👏🎉#INDvSL pic.twitter.com/5XwoXPeNBx
— BCCI (@BCCI) January 10, 2020
विजयासाठी २०२ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात चांगली झाली नाही. दनुष्का गुणातालिका १, अविष्का फर्नांडो ९, कुसल परेरा ७ आणि ओशदा फर्नांडो २ धावांवर झटपट बाद झाल्याने श्रीलंकेची ५.१ षटकांत ४ बाद २६ अशी स्थिती झाली होती. त्यानंतर एंजेलो मैथ्यूज आणि धनंजया डी सिल्वा यांनी थोडासा संघर्ष केला आणि पाचव्या विकेटसाठी ६८ धावांची भागिदारी केली. पण सुंदरने मनीष पांडेकरवी मैथ्यूजला ३१ धावांवर झेलबाद करत ही जोडी फोडली.
त्यानंतर श्रीलंकेचे अखेरचे पाच फलंदाज अवघ्या २९ धावांत बाद झाल्याने श्रीलंकेचा डाव अवघ्या १५.५ षटकांत १२३ धावसंख्येवर आटोपला. श्रीलंकेकडून धनंजया डी सिल्वाने ३६ चेंडूत ८ चौकार व १ षटकारासह ५७ धावा करत संघर्ष केला पण संघास विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला.
भारताकडून नवदीप सैनीने ३.५ षटकांत २८ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर शार्दुल ठाकूरने १९ धावात २ आणि वाॅशिग्टंन सुंदरने ३७ धावा देत २ गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने २ षटकांत ५ धावा देत १ गडी बाद केला. आजच्या सामन्याचा मानकरी भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर तर मालिकेचा मानकरी वेगवान गोलंदाज नवदीप सैनी ठरला.
तत्पूर्वी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारतास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होते. भारताची दमदार सुरूवात झाली. सलामीवीर शिखर आणि राहुलने पहिल्या विकेटसाठी १०.५ षटकांत ९७ धावांची भागिदारी केली. शिखरला झेलबाद करत संदाकनने ही जोडी फोडली. शिखरने ३६ चेंडूत ७ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या. त्यानंतर संघाची धावसंख्या १०६ असताना संजू सॅमसन ६ धावा काढून बाद झाला. त्यानंतर संघाची धावसंख्या ११८ (१२.३) असताना राहुल माघारी परतला. राहुलने ३६ चेंडूत ५ चौकार व १ षटकारासह ५४ धावांची खेळी केली.
3rd T20I. 17.4: WICKET! W Sundar (0) is out, c Lakshan Sandakan b Lahiru Kumara, 164/6 https://t.co/AVxq9gsEuY #IndvSL @Paytm
— BCCI (@BCCI) January 10, 2020
त्यानंतर श्रेयस अय्यर ४(२) तर विराट कोहली २६(१७) धावांवर बाद झाला. पाठोपाठ वाॅशिंगटन सुंदर शून्यावर बाद झाला. त्यावेळी भारताची धावसंख्या १७.४ षटकांत ६ बाद १६४ अशी होती. त्यानंतर मनीष पांडे आणि शार्दुल ठाकूर यांनी फलंदाजीची धूरा हाती घेत शेवटच्या १४ चेंडूत ३७ धावा काढल्या आणि संघाची धावसंख्या २० षटकांत ६ बाद २०१ पर्यंत नेली. मनीष पांडेने १८ चेंडूत ४ चौकारासह नाबाद ३१ तर शार्दुल ठाकूरने ८ चेंडूत १ चौकार व २ षटकारासह नाबाद २२ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. श्रीलंकेकडून लक्षण संदाकनने सर्वाधिक ३ तर वाणिदु हसरंगा आणि लहिरू कुमारा याने प्रत्येकी १ गडी बाद केला.