तिरुअनंतपूरम – भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला आज येथे होत असलेल्या पहिल्या सामन्याने प्रारंभ होत आहे. 2018 सालापासून भारताविरुद्ध एकही टी-20 सामना दक्षिण आफ्रिकेने गमावलेला नाही, मात्र हाच नकोसा इतिहास बदलण्याची संधी मायदेशातच खेळत असलेल्या भारतीय संघाला मिळाली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
वेळ : संध्याकाळी 7 पासून
ठीकाण : तिरुअनंतपूरम
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्टस
ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकलेल्या भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असला तरीही काही प्रश्न अद्याप अनुत्तरीतच राहिले आहेत. सलामीला लोकेश राहुल व कर्णधार रोहित शर्मा यांच्या खेळीत सातत्याचा अभाव आहे. विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांच्यासह दीनेश कार्तिकने सातत्य दाखवले आहे. तसेच फलंदाजीत भारतीय संघाला सलामीसह मधल्या षटकांतील मंदावलेल्या धावगतीवरही उपाय शोधावा लागणार आहे. 8 व्या षटकापासून 14 व्या षटकापर्यंतची धावगती सहा धावांचीही राहिलेली नसल्याचे अनेक सामन्यांत दिसून आले आहे. त्यातही कोहली व सूर्यकुमार यांना अपयश आले तर अष्टपैलु हार्दिक पंड्या व कार्तिक व्यतरीक्त संघाकडे सर्वोत्तम पर्यायही नाहीत. अशा स्थितीत दीपक चहर व दीपक हुडा यांची उपलब्धता असूनही त्यांना फारशी पसंती देताना संघ व्यवस्थापन दिसलेले नाही.
गोलंदाजीतही अनेक प्रश्न दिसतात. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात परतला असला तरीही तो त्याच्या मुळ भरात दिसत नाही. फिरकी गोलंदाजीत यजुवेंद्र चहलपेक्षा अक्सर पटेलने अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. मात्र, किमान तिन वेगवान गोलंदाज व दोन फिरकी गोलंदाज ही खरी भारतीय संघाची गरज आहे. मात्र, फलंदाजी सशक्त करण्यासाठी तिसरा गोलंदाज म्हणून पंड्याचाच समावेश केला जात आहे. त्याच्यासह भुवनेश्वर कुमारला विश्रांती दिली जाऊ शकते. ऑस्ट्रेलियात पुढील महिन्यात सुरु होत असलेली टी-20 विश्वकरंडक स्पर्धा व तेथिल खेळपट्ट्यांचे स्वरुप पाहता तिसरा गोलंदाज याच मालिकेतून समोर यावा यासाठी हर्षल पटेलसह अन्य पर्यायांचाही विचार करणे गरजेचे आहे.
दक्षिण आफ्रिकेबाबत बोलायचे झाले तर कर्णधार टेम्बा बवुमा, एडन मार्करम, क्वांटन डीकॉक, डेव्हीड मिलर, मार्को जॉन्सन अशी भक्कम फलंदाजांची फळी त्यांच्याकडे आहे. गोलंदाजीत अनरीच नोर्जे, केशव महाराज, लुंगी एन्जीडी, वेन पार्नेल व कागिसो रबाडा असे सरस गोलंदाजही त्यांच्याकडे आहेत. त्यातच 2018 सालापासून त्यांनी भारताविरुद्धची टी-20 लढत गमावलेली नसल्याने मायदेशात खेळण्याचा लाभ भारतीय संघाला होईल असे जरी सांगितले जात असले तरीही या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचेच पारडे जड राहणार आहे.
राहुल कधी भरात येणार
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहूल कधी भरात येणार हा मोठा प्रश्न भारतीय संघासमोर निर्माण झाला आहे. कर्णधार रोहित शर्मासह डावाची सुरुवात करताना अपेक्षित सलामी देण्यात राहुल सातत्याने अपयशी ठरत आहे. गेल्या दोन ते तिन महिन्यांपासून अनेक पर्याय सलामीला फलंदाजीसाठी वापरले गेले मात्र, त्यातही यश आलेले नाही. विराट कोहलीनेही रोहितसह काही सामन्यांत डावाची सुरुवात केली होती व चांगली सलामीही मिळाली होती. मात्र, कोहली नियमित सलामीवीर नसल्याने हा प्रयोग प्रत्येक वेळी यशस्वी होणार नाही. त्यामुळे राहुललाच जबाबदारीने खेळून सरस कामगिरी करावी लागणार आहे, अन्यथा त्याचे संघातील स्थानही धोक्यात येऊ शकते. सराव करताना चांगली फलंदाजी होते मात्र, त्याचे रुपांतर प्रत्यक्ष सामन्यात होताना दिसत नाही.