हैदराबाद – दीनेश कार्तिक सध्या प्रचंड भरात आहे. त्याचा आत्मविश्वासही उंचावला आहे, त्यामुळे पुढील सामन्यांत त्याच्या वाट्याला जास्तीत जास्त चेंडू कसे येतील यावर भर देणार आहे, असे मत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले आहे. मात्र, त्याच्या या वक्तव्यात ऋषभ पंतला साइडट्रॅकला टाकले जात असल्याचे संकेत मिळत असून आता ऑस्ट्रेलियात पुढील महिन्यापासून सुरु होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी पंत संघ व्यवस्थापनाची पसंती नसेल हेच समोर येत आहे.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरूद्धची तीन टी-20 सामन्यांची मालिका जिंकून टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी चांगला सराव केला आहे. भारताच्या अंतिम अकरा खेलाडूंच्या संघात कार्तिक हीच पहिली पसंती राहणार हे रोहितच्या वक्तव्यावरून उघड दिसत आहे. आशिया करंडक स्पर्धेपर्यंत सातत्याने पंतची पाठराखण करत असलेला रोहित अचानक कार्तिकचे गुणगान कसा काय करु लागला असा प्रश्नही आता पडलेला आहे. मात्र, वारंवार संधी देऊनही पंतच्या कामगिरीत सुधारणा झालेली नाही तसेच त्याला अद्याप जबाबदारीची जाणीव झाल्याचेही दिसलेले नाही. अशा स्थितीत अंतिम संघ निवड करताना पंतच्या जागी कार्तिकलाच पुढे संधी दिली जाणार हे देखील या मतांवरून स्पष्ट होत आहे.
पंतच्या जागी कार्तिकलाच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिनही टी-20 सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली व कार्तिकनेही या संधीचे सोने केले. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियालाचा पराभव केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतही रोहित कार्तिकचेच कौतुक करताना दिसला होता.
आम्हाला विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी कार्तिकला जास्तीत जास्त संधी द्यायची आहे. त्याच्या वाट्याला जास्त चेंडू यावेत ही आमची अपेक्षा आहे. सध्या त्यावरच भर देण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही हेच धोरण राहील, असे रोहितने सांगितले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या यशस्वी मालिकेनंतर आता भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. आजपासून (बुधवार) घरच्या मैदानावरच हे सामने खेळवले जाणार आहेत.
पंतलाही संधी देणार
कार्तिकचे गुणगान करताना रोहितने पंतलाही पुरेशी संधी दिली जाणार असल्याचे सांगितले. मात्र, रोहितच्या गुडबुकमध्ये कार्तिकच असल्याचे त्याच्या मतावरून दिसून आल्यामुळे येत्या काळात पंतची संघातील जागाही राहिल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.