रांची – तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 ने पराभव केल्यानंतर भारतीय संघ (Team India) आता तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामन्यास काहीच वेळात रांची येथे सुरूवात होणार आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत निर्विवाद विजय मिळवलेला भारतीय संघआता टी-20 सामना जिंकून याही मालिकेत विजय सातत्य राखण्यासाठी सज्ज झाला आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा (Toss) भारताच्या बाजूने लागला आहे. भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने क्षेत्ररक्षण स्विकारताना न्यूझीलंड संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
1ST T20I. India won the toss and elected to field. https://t.co/gyRPMYUCME #INDvNZ @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 27, 2023
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडियाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. संघाला ही कामगिरी पुढेही सुरू ठेवायची आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडची कमान अनुभवी अष्टपैलू मिचेल सँटनरच्या हाती आहे. मात्र, सँटनरला कर्णधारपदाचा फारसा अनुभव नाही. अशा स्थितीत भारतीय संघ याचा फायदा घेऊ शकतो.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण 22 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 10, तर किवी संघाने नऊ सामने जिंकले आहेत. तीन सामने बरोबरीत राहिले आहेत. दोन्ही संघ भारतात आठ वेळा आमनेसामने आले आहेत. यातील टीम इंडियाने पाचवेळा, तर न्यूझीलंडने तीन सामने जिंकले आहेत.