- महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
पिंपरी – विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन उकळते ऑइल अंगावर पडल्याने पाच महिन्याच्या लहान मुलगी, तिची आई व आजी असा तीन जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.
महावितरणचे अधिकारी सुनील रोटे आणि अन्य संबंधित अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप भगवान कोतवाल (वय 59, रा. राजवाडा, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी मंगळवारी (दि. 8) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शारदा दिलीप कोतवाल (वय 51), शिवन्या काकडे (वय 4 महिने) आणि हर्षदा सचिन काकडे (वय 32) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी कोतवाल यांच्या घराजवळ असलेला विद्युत रोहित्र नादुरुस्त होता. त्याबाबत कोतवाल यांनी महावितरणच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना सांगितले होते. वारंवार सांगून देखील महावितरणकडून सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेण्यात आली नाही.
5 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता विद्युत रोहित्राचा बिघाड झाला. महावितरणच्या लोकांनी तो विद्युत रोहित्र काढून दुसरा विद्युत रोहित्र बसवले. मात्र ते देखील नादुरुस्त होते. त्याचा स्फोट झाला आणि त्यातून उकळते ऑइल बाहेर पडले. ते उकळते ऑइल अंगावर पडल्याने तिघींचा मृत्यू झाला. याबाबत महावितरणच्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम 304 (अ), 338 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
इंद्रायणीनगर येथे महावितरणच्या रोहित्राचा स्फोट झाला होता. स्फोटानंतर रोहित्रातील उकळते तेल अंगावर सांडल्याने एका पाच महिन्याच्या चिमुकलीचा आणि तिच्या आजीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता त्या चिमुकलीच्या आईचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
हर्षदा सचिन काकडे (वय 32) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. यापूर्वी शारदा दिलीप कोतवाल (वय 51), शिवण्या सचिन काकडे (वय 5 महिने) यांचा मृत्यू झाला होता. इंद्रायणीनगर परिसरातील राजवाडा भागात बिल्डींग क्रमांक तीन जवळ महावितरणकडून विद्युत रोहित्र बसवण्यात आले आहे. त्या रोहित्राच्या शेजारी एका पत्र्याच्या घरात दिलीप कोतवाल कुटुंब राहत आहे.
कोतवाल यांची मुलगी आपल्या पाच महिन्यांच्या चिमुकलीसह माहेरपणासाठी आली होती. शनिवारी दुपारी घरासमोरील अंगणात कोतवाल आजी त्यांच्या मुलीसह आपल्या नातीला अंघोळ घालत होत्या. त्यावेळी विद्युत रोहीत्राचा स्फोट झाला. रोहित्रामधून उकळते ऑईल अंगावर उडाल्याने त्या तिघीही गंभीर जखमी झाल्या होत्या. त्या तिघींनाही पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असताना शनिवारी रात्री शारदा आणि शिवण्या यांचा मृत्यू झाला. हर्षदा देखील 80 ते 90 टक्के भाजल्या होत्या. त्यांचाही मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.