वॉशिंग्टन – दोनच दिवसांपूर्वी भारत आणि अमेरिका या दोन देशांत 2+2 स्तरावरची चर्चा झाली. त्यातून चीनसारख्या विरोधी देशांना स्पष्ट आणि कठोर संदेश मिळेल असा विश्वास अमेरिकेतील सिनेटर केविन क्रामर यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही काळात विशेषत: करोनाच्या उद्रेकापासून अमेरिका आणि चीनच्या संबंधांत कटूता आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प तर अजुनही करोनाला चीनी व्हायरस असेच संबोधत आहेत. त्यातच तैवानला चीन आपला भाग मानते. अन्य देशांनी त्याला स्वतंत्र देश मानण्यास आणि तैवानशी वेगळे राजकीय संबंध प्रस्थापित करण्यास चीनचा विरोध आहे.
मात्र अमेरिकेने आता तैवानशी थेट आणि वेगळे संबंध प्रस्थापित करण्यास सुरूवात केली आहे. तसेच चीनचा इशारा आणि विरोध डावलून तैवानला मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रास्त्रे देण्याच्या निर्णयावरही शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे अमेरिका चीन संबंधांत कमालीचे वितुष्ट निर्माण झाले आहे.
भारतासोबतही चीनने गलवान भागात आगळीक करून मीठाचा खडा टाकला आहे. लेह भागात सीमेवर तणावाची स्थिती कायम आहे. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची दोनच दिवसांपूर्वी बैठक झाली. त्यात बेका या महत्वाच्या करारासह पाच करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.
भारताचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य जपले जाईल अशी जाहीर ग्वाही देताना सामरिक स्तरावर महत्वाची माहिती दिली जाण्याची ग्वाही अमेरिकेने भारताला दिली आहे. भारत अमेरिका संबंधांतील निकटता चीनला खटकत असून त्या देशात यावरून कमालीची अस्वस्थता आहे.
याबाबत क्रामर यांनी भाष्य केले आहे. हे दोन्ही देश जवळ आल्याने जगातल्या अन्य विरोधी देशांना स्पष्ट आणि कठोर संदेश जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत आणि अमेरिका मैत्रीतून आर्थिक संधीची नवी दारेही खुली होणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.